Tuesday, March 31, 2020

संवादिनी कथासंग्रह परिचय लेख- भाग -५ वा

#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख- भाग -५ वा . ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
कथा लेखक- १. अमित सोनवणे , २.शशांक गिरडकर , ३. रुपाली मोनीष खैरनार
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रसिक वाचक-मित्र हो -
कुबेर समूह प्रकाशित संवादिनी कथासंग्रह -आतापर्यंत आपण या लेख-मालिकेचे चार भाग वाचले आहेत . या कथासंग्रहातील
कथा-लेखन हे वाचनीय आहे : हे आता वेगळ्याने पुन्हा-पुन्हा सांगायचे प्रयोजन राहिलेले नाही.
कुबेरकर लेखक आणि लेखिका यांचे पुस्तक-रूपाने आलेले कथा लेखन वाचकांच्या अपेक्षा नक्कीच वाढवणारे आहे ".
आजच्या लेखात आपण खालील कथांचा आस्वाद घेऊ या .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१.कथा -
शिर्षक- एक धागा सुखाचा (पृ. ४८ ), ले- अमित सोनवणे -नंदुरबार
------------------------------------------------------------------------------------------------
माणसाचे आयुष्य हे एक जरतारी वस्त्र आहे ..यात दु:खाचे धागे शंभर काय , हजारो असतात ,आणि सुखाचा धागा
मात्र एकच असतो , "
या अर्थाची प्रचीती यावी अशी एक सुंदर कथा या संग्रहात आहे.."एक धागा सुखाचा .."
..अभ्यंग "या तरुणाच्या कलात्मक ध्यासाची आणि त्या ध्यासाच्या पूर्ततेसाठी त्याने केलेल्या परिश्रमपूर्वक अशा वाटचालीची
कथा लेखक- अमित सोनवणे यांनी अतिशय सुरेख पद्धतीने खुलवली आहे.
सुख पाहता जवापाडे | दु:खः पर्वताएवढे || हेच अभ्यंगच्या आयुष्याचे गमक आणि सत्य आहे ..या वाक्याने कथेचा आरंभ होतो.
अभ्यंगचे वडील एक निष्णात असे हातमाग- कारागीर , पैठणी विणून ऐश्वर्य कमावणारे आपले वडील त्यांच्या संसाराचा सारीपाटाचा
डाव अर्ध्यावर टाकून .त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेत ..नातेवाईक आणि इतर लोकांच्या त्रासामुळे अतिशय हलाखीचे
असे आयुष्य त्याच्या आईच्या वाट्याला आले ..आणि इथून अभ्यंगच्या आणि त्याच्या आईच्या संघर्षमय आयुष्य प्रवासास सुरुवात होते.
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाजूला ठेवीत पैठणीच्या व्यवसायात काम करण्याची सक्ती त्याची आई करते , तो देखील हे काम करू लागतो ,
त्याच वेळी सर्वांना जाणवते ..त्याच्या बोटा मध्ये धागा विणायची अजब जादू पांडुरंगाने त्याला दिली आहे.
अप्रतिम काम करायचा ध्यास " ही देणगी अभ्यंगला त्याच्या वडिलांच्या कडून वारश्याने मिळाली आहे.
.
अभ्यंग "ही फक्त एका माणसाची व्यक्तिरेखा नाहीये ..
ही कथा आहे- ती एका .स्वप्नाळू आणि तितक्याच हळव्या मनाच्या तरुणाची ,
जो एक निष्णात कारागीर आहे, आपल्या हातातील जादुई कलेचे मोल किती आहे "याची जाणीव त्याला आहे.
परिश्रम , कल्पकता ,जिद्द आणि आत्मविश्वास असला की एरव्ही सामन्य वाटणारा माणूस किती अफाट असे सुंदर कलात्मक कार्य करू शकतो "
हे अभ्यंग " या व्यक्तिरेखेतून लेखक अमित सोनवणे यांनी खूप छान रेखाटले आहे.
, त्याच्या जीवनात त्याची स्फूर्ती बनून आलेली वैष्णवी ,त्यांच्यातील प्रेम ..हे सगळ या कथेला वेगळ परिमाण देऊन जातात .
अभ्यंग ची स्वप्नपूर्तीची ही कथा वाचकांना सुखद अनुभव देणारी आहे.
लेखक- अमित सोनवणे यांना लेखन शुभेच्छा .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२.
कथा -
शिर्षक- गण्या . (पृ. ५४ ) ले- शशांक गिरडकर , वर्धा .
--------------------------------------------------------------------------------------------
लेखक - शशांक गिरडकर यांची "गण्या " ही कथा ..एक उत्तम अशी व्यक्ती -चित्रण "असलेली छान अशी कथा आहे.
दोन जिवलग मित्रांची ही कथा ..माणूस ,त्याचे आयुष्य , तो करीत असलेला आयुष्य-प्रवास "यावर आहे.
"गरीब-श्रीमंत " या भेदाचा परिणाम या दोन मित्रांच्या मैत्रीवर कधीच झालेला नाहीये,
क्रिकेट आणि सिनेमाची आवड " इतकेच साम्य असलेले हे दोन मित्र अगदी भिन्न स्तरावरचे आयुष्य जगणारे असले तरी
त्यांच्यातील मैत्री आणि मनातील मैत्र-भाव कायम आहे .
आयुष्य आणि आयुष्यात माणूस निर्णय घेत असतो . " काही निर्णय आयुष्यात आमुल्राग बदल करतात ", कथेतील हे वाक्य
फार महत्वाचे आहे , आणि गण्याच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारा हा निर्णय घेणारी ..गण्याची ..प्रेमिका ,जी पुढे
त्याच्या आयुष्याला सावरणारी , घडवणारी अशी त्याची बायको होऊन त्याची कायमची सोबती , सहचरी झालेली आहे.
लेखक तिच्या विषयी भावनिक मनोगत यक्त करतो ..पण या शब्दातून गण्याच्या मैत्रिणीचे " प्रेमिका आणि पत्नी " अशा
दोन्ही स्वरूपातील व्यक्तिमत्वाचे सुरेख असे दर्शन आपल्याला लेखक घडवतो ,ते खूप छान आहे.
विमानात बसून प्रवास करणारा ..गण्या ..कायम जमींवर पाय असलेला गण्या , आणि , जरा ही न बदललेला तसाच "निरागस मित्र ..गण्या ,
गणेश आहे " ही भावनिक प्रचीती ..मनाला भारावून टाकणारी आहे.
आपण ही सहजपणे म्हणून जातो ..हे गणराया !
"गण्या " आहे तशी छोटीशी कथा ..पण मित्र -प्रेमाने अगदी काठोकाठ भरून गेलेली ही कथा मनस्पर्शी झाली आहे.
लेखक - शशांक गिरडकर यांना लेखन -शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३.
कथा -
शिर्षक- मुक्त (पृ.६३ ), ले- रुपाली मोनीष खैरनार - मुंबई .
----------------------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी या कथासंग्रहात ..मोजक्याच अशा काही कथा आहेत ..ज्या चाकोरीबाहेरच्या विषयावर आहेत, अशा विषयावर लिहिणे
म्हणजे ..कथेच्या परिचित अशा परिघाच्या बाहेर जाऊन एखाद्या चर्चित विषयावर लेखन करणे असते .
लेखिका ..रुपाली मोनिष खैरनार ..यांनी त्यांच्या "मुक्त " या कथेतून ..समलिंगी मनोवृत्तीच्या "व्यक्तीचे चित्रण केलेलं आहे.
पायल आणि राशी "या दोन युवतींच्या मैत्री सहवासाची कथा ..यात मानसिक आंदोलने , मानसिक पातळीवर मनामध्ये सुरु झालेले
विरोधी आणि अकल्पनीय असे मनो-व्यापार सुरु झाल्याची चाहूल लागते .
राशीत होत जाणारे हे बदल जाणवतात आणि..त्यामुळे पायल तिला आधार द्यायला जाते, एका वेगळ्या भावनिक स्तरावर
या दोघी जगू लागतात , अशा क्षणी आपणच एकेमेकीसाठी कसे नि किती महत्वाचे आहोत हे दोघीना कळू लागते ..पटायला लागते.
स्वतःच्या नव्या विश्वात ..राशी जितकी खोल खोल गुंतत जाते, तितकीच आपल्या सोबत ती पायलला पण खेचून नेत असते ,जणू काही
राशीच्या सहवासात पायल संमोहित होऊन गेलेली आहे. अशा मनोवास्थेत राशी ..म्हणते ..पायल ..तुही माझ्या सारखीच आहेस ..
"homosexual..."समलिंगी !!!!!
पायल आणि राशी .या तसे पाहिले तर उमलू पहाणार्या कालिका आहेत, पण.. किती भयानक चक्रात त्या सापडल्या आहेत, या जाणीवेने
आपणपण अस्वथ होऊन जातो .
या चक्रातून राशी आणि पायल "या मुलींना बाहेर काढणाऱ्या पायलच्या आईची ..नामिताची सुद्धा ही कथा आहे...
या कथेतील आगळे-वेगळे भाव-विश्व , पायल आणि राशी, पायलची जागरूक - आई -नमिता , दोन्ही मुलींचे परिवार ,
समुपदेशक डॉक्टर निशा ..आपल्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहतील.
पूर्ण कथा वाचून पहा , खूप वेगळा अनुभव येईल .लेखन आणि शब्द योजना एकदम अचूक आहे, ज्यामुळे कथा तीव्र परिणाम साधून जाते.
आधुनिक जीवनशैलीच्या आहारी गेलेल्या समाज-समुहात ..या समस्येने आपले अस्तिव दाखवायला सुरु केले आहे.
अशा या समस्येवर लेखन करून
लेखिकेने "अतिशय महत्वाच्या अशा प्रश्नाकडे लक्ष वेधून धोक्याचा इशारा दिला आहे.
"मुक्ता " त्यांच्या लेखन-प्रवासातील एक लक्षणीय कथा ठरेल असे म्हणावेसे वाटते.
लेखिका रुपाली मोनीष खैरनार याना लेखन शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग -५ वा .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
-----------------------------------

संवादिनी कथासंग्रह परिचय लेख - भाग-४ था



#संवादिनीकथासंग्रह - परिचय

भाग - ४ था - ले- अरुण वि.देशपांडे
कथा -लेखिका - १.. निशा डांगे , २..पूजा लबडे-देसाई , ३..अलका वेद स्वप्नाली
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रसिक वाचक हो नमस्कार ,
पहिले तीन लेख वाचल्यावर तुम्हाला कल्पना आलीच असणार ..की कुबेर समूह प्रकाशित - "संवादिनी "
या कथा -संग्रहातील कथांच्या मध्ये विषय विविधता आहे, नाविन्यपूर्ण मांडणी आहे ,कथालेखनाचे हे दोन मुख्य
घटक या संग्रहातील कथांमधून तुम्हाला नक्कीच जाणवतील .
आजच्या लेखात ज्या कथांचा आस्वाद-परिचय करून देणार आहेत त्या कथा या 3 लेखिकांच्या आहेत .
यातील पहिली कथा -
----------------------------------
१.कथा -
शीर्षक - वाळवी - (पृ.२७ )- ले- निशा डांगे-यवतमाळ
----------------------------------------------------------------------------------------------
या संग्रहातील विस्ताराने सर्वात मोठी असलेली कथा , "वाळवी " .
एखाद्या मेलोड्रामा फिल्मची स्क्रिप्ट वाटेल . या कथेतील व्यक्तिरेखा ..मधुरा आणि तिचा नवरा - विठ्ठल ..
दोन टोकाच्या आणि परस्पर विरुद्ध असणार्या आहेत.
..मधुरा "या नायिकेसमोर तिचा नवरा - विठ्ठल "
खलनायक वाटणारा माणूस आहे, त्याची वर्तन पद्धती , त्याला फक्त मधुरेचा जणू सूडच घायचा आहे,अशी आहे.
पती म्हणून तो विजोड आहे .
पत्नी म्हणून मधुराशी असलेलेले त्याचे नाते ..केवळ " त्याच्या सुख-सोयीसाठीचे आहे "असे समजून वागणारा हा विठ्ठल .
मधुराच्या आयुष्याला लागलेली वाळवी " आहे असे नक्कीच वाटेल.
मधुरा आणि विठ्ठल ..यांच्यातील नाते ..हे मधुरावर सर्वाथाने एक लादलेले नाते आहे . नायिका -मधुरा ही व्यक्तिरेखा
असहाय ,हतबल, सारे काही सहन करणारी "स्त्री "आहे .अशा स्त्रिया आपल्या अवतीभवती असणे अगदीच अशक्य नाहीये "
लेखिका निशा डांगे .यांच्या वाळवी "या कथेतील सर्व व्यक्तिरेखा "टेलर -मेड "आहेत असे म्हणावे वाटते
"ज्या कथानाकानुसार बेतलेल्या आहेत असे म्हणू या...त्यामुळे त्या खऱ्या-खुऱ्या न वाटता फक्त कथेचा भाग आहेत वाटून जातात .
यातील प्रसंग आणि घटना यांचे अगदी क्रमाने येणे .म्हणजे नायिकेवर -मधुरेवर कोसळणारे एक एक यातनादायक प्रसंगच आहे.
मधुराच्या वाट्याला आलेले अखंड दुर्दैव .आणि यास कारणीभूत ठरलेला विठ्ठल .वाचकांच्या लक्षात लक्षात राहील..
लेखिका -निशा डांगे यांच्या लेखनातील सफाईदारपणा , भाषा आणि वर्णन-शैली , बारकाईने केलेले सगळे वर्णन या गोष्टीमुळे
वाचक "वाळवी " कथा समरस होऊन वाचतील .
लेखिका -निशा डांगे यांच्या लेखनास शुभेच्छा .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा -२
शीर्षक -झाड ,(पृ.३८ ) ले- पूजा लबडे -देसाई ,पुणे .
---------------------------------------------------------------------------------------
संवादिनी कथासंग्रहातील - झाड "ही कथा - "एक वेगळी कथा आहे " असा उल्लेख करावा लागेल.
लेखिका -पूजा लबडे -देसाई यांची ही कथा आरंभापासूनच वाचकांच्या मनात मोठेच कुतूहल जागृत
करण्यात यशस्वी होते . ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो ते ."झाड "या कथेत छान जमून आले आहे.
चौधरी डेवलपर्स ",या संस्थेचे मालक मंगेशराव यांना वेड लागलाय ", झाड झालायं त्या बाबांचं " ,अशा वर्णनाने कथा पुढे सरकते ,
त्या वरून ही गूढ कथा वाटू लागते .. आणि घडणाऱ्या घटना या गुढतेत अधिकच भर टाकीत जातात . अशा प्रकारच्या कथेत
असणारे प्रत्येक पात्र आपल्या वागण्याने रहस्य वाढवत जाते.
आणि ही गूढता अधिक गहिरी कशी होत जाईल "याची काळजी घेत लेखिका पूजा -लबडे देसाई यांनी आपल्या छोट्या कथेत छान रंग भरले आहेत .
कथेचा पूर्वार्ध - आबासाहेबांच्या संपती आणि त्याच्या विल्हेवाट याबद्दलचा आहे,त्यांच्या आकस्मिक निधनाने या कथा विषयाची
गूढता अधिकच वाढते , हे सारे काही आबासाहेबांच्या संपत्ती मिळवण्याच्या हव्यासापोटी चालू आहे असेच वाटू लागते ..,
आणि अचानक ही कथा एका वेगळे वळण घेते . अनेक अनाकलनीय आणि संशयास्पद घटना घडत जातात , त्या सर्वांनाच
चक्रावून टाकणाऱ्या आहेत .
नवीन प्रोजेक्ट ,प्रोजेक्ट साईट , साईटसाठी ताब्यात आलेली जमीन ,प्रोजेक्टवर काम करणारी माणसे , यांच्यावर अचानक संकट
कोसळते , पण हे नेमके काय हे मात्र कळत नाही , माणसांचे गायब होणे , साईटवर आणि आजूबाजूला वेगाने उगवणारी
झुडूप आणि मोठी झाडं" हे काय आहे ?
या सगळ्या रहस्याचा उलगडा होतो त्यामागचे कारण अनपेक्षित आहे.
जे वाचून वाचक म्हणेन बापरे .हे असे असू शकते ?
त्यासाठी पूजा लबडे -देसाई यांची "झाड " ही कथा वाचायला हवी आहे.
त्यांच्या भावी लेखन प्रवासास शुभेच्छा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३.
कथा - शिर्षक- तो आणि ती ", (पृ. ४२ ), ले- अलका वेद स्वप्नाली
---------------------------------------------------------------------------------------------
कथा-लेखिका अलका वेद स्वप्नाली यांची"तो आणि ती " कथा अगदी ".कथेच्या फ्रेम मध्ये अगदी बंदिस्त आहे.पूर्ण कथा "तो आणि "ती"
यांच्या भोवती फिरते, विषयाला धरून हे कथालेखन असल्यामुळे कथेतील "तो आणि ती",या व्यक्तिरेखा ठळकपणे समोर येतात.
"तो आणि ती " , यांना व्यक्ती -नावे नाहीत , तरी यामुळे काहीच अडलेले नाहीये हे विशेष.
एका पती पत्नीच्या संसारिक जीवनातील "वादळ-वाटांची "ही प्रत्यकारी अशी भावनिक कथा आहे.
या कथेतील "ती " हे प्रधान -व्यक्तिरेखा आहे ,आणि तो" तिचा सर्वस्व आहे,हे तिच्या मनातल्या
भावनिक विचारांमुळे सतत जाणवते .
विसंवादात ही एक संवाद होत असतो जो , तो कसा एकमेकांना समजून घेण्याचा एक प्रवास आहे,.. हे या कथेेेतूून जााणवलेेेल सार आहे.
यामुळेच खरेतर "तो "आणि "ती "सावरले जातात याचे श्रेय एकट्या .. "ती " चे आहे.
या कथेतील "तो ला स्वतः बद्दल झालेली जाणीव - "यश मिळवायला शिकलो मी , पण अपयश
पचवायला शिकलो नाही ",हे जााणवण्याचे कारण-
'कसोटीच्या क्षणी या "तो च्या पाठीशी .."ती " भक्कमपणे उभी रहाते ," हे आहे.
स्त्री-व्यक्तिमत्वातील आणि कथा नायिका "ती " च्या
मनात असलेल्या वात्सल्य -भावनेचे उदात्त असे भावदर्शन " लेखिकेने "ती "च्या व्यक्तीमत्वातून
खूप छान घडवले आहे.
"ती " म्हणते लग्न म्हणजे खेळ नाही ..,जमलं नाही ,आवडले नाही , की डाव मोडायला ..
आपले कल्चर सुद्धा नेहमी हेच सांगत आले आहे.
कुटुंबातील सर्वांची एकमेकांना साथ-सोबत हवी तरच मोडलेले पुन्हा जोडले जाते .
वाचकांना एक भावनिक समाधान देणारी "तो आणि ती "ही कथा खूप आवडेल.
लेखिका -अलका वेद स्वप्नाली यांना लेखन शुभेच्छा
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी कथा -परिचय - भाग- ५ वा लवकरच ...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#संवादिनीकथासंग्रहपरिचय -भाग - ४ था -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - 9850177342
------------------------------------------------------------------------------------------------

Like
Comment

पुस्तक-परिचय लेख- कविता -संग्रह- मुग्धायणी

पुस्तक-परिचय -लेख-
ले- अरुण वि.देशपांडे.
-------------------------------------------------------------------
मुग्धायणी- कवितासंग्रह
"मंत्रमुग्ध करणाऱ्या रचना"
-----------------------------------------------
नियमित लेखनामुळे इंटरनेट, फेसबूक या माध्यमातून आता निशा डांगे"या कवयित्री म्हणून परिचित झालेल्या आहेत.याशिवाय
एक लेखिका ,आणि साहित्यक्षेत्रात एक कार्यकर्ता, कुशल आयोजिक- संघटक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
"मुग्धायणी " या आकर्षक शीर्षकाने त्यांचा पहिला कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. १२० पृष्ठांच्या पुस्तकात निशा डांगे"
या कवयित्रीच्या ७९ कवितांचा अविष्कार रसिकांना वाचावयास मिळतो. कवयित्रीची लेखन-निष्ठा आणि कवितेवर असलेली श्रद्धायुक्त
भावना " यामुळे या कविता लेखनासाठी कवयित्री म्हणून निशा डांगे घेत असलेल्या लेखन-परिश्रमांची कल्पना येते .
त्यांच्या कवितांचे "हे पहिलेच संग्रह-रूप असले तरी , त्यांचा लेखन-प्रवास मात्र नवखेपणाचा नाहीये , संग्रहातील ७९ विविध कविता
वाचून झाल्यावर जाणवते की या कवयित्रीच्या .. कविता .या लय , ताल ,यांचे भान सांभाळणार्या आहेत.
आपली कविता रसिकांच्या मनापर्यंत न्यायची असेल तर त्यासाठी . कवितेंत आशय नेमकेपणाने मांडता येणे साधले पाहिजे ",
निशा डांगे यांच्या कवितेने आशयभान जपलेले आहे.
मुग्धायणी" संग्रहातील कविता वाचून पाहिल्यावर कवीचे व्यक्त होणे "ही एक साधी गोष्ट नाहीये ,हे जाणवू लागते.कारण यात विविध
कविता प्रकार ,आणि भाव-भावनाचे अविष्कार व्यक्त झालेले दिसतील.
कविता सापडणे, तिची सोबत मिळणे, संवाद करणारे शब्द मित्र म्हणून मिळणे , आणि एक कवी म्हणून वाचकांशी भावबंध जुळणे"
कवीच्या वाट्याला येणारे हे भाग्ययोग .कवयित्री निशा डांगे यांच्या वाट्याला त्यांच्या कविता-लेखनामुळे आले आहेत .
कवयित्री -निशा डांगे यांच्या मुग्धायणी
या संग्रहातील कवितां बद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की- हे कविता लेखन त्यांनी मनातून ,समरस होऊन केले आहे.
मनातील सारे काही सांगण्यासाठी माझ्या शब्दातून मांडण्यासाठी
" माझी कविता आहे ना"! ही त्यांना त्यांच्या आतल्या मनाने दिलेली हाक आहे .
ही आंतरिक साद म्हणजेच रसिकांशी साधलेला संवाद म्हणजे निशा डांगे यांच्या कविता आहेत.
या संग्रहाचा आरंभ - त्यातली पहिली १७ पाने - ही कवयित्री निशा डांगे यांच्या कविता लेखनाबद्दल
मान्यवरांनी व्यक्त केलेल्या अभिप्रायपर मनोगतास दिलेली आहेत..
यात - आदरणीय डॉ. विजया वाड यांचे प्रास्तविक आणि मलपृष्ठावरचे समर्पक ब्लर्ब ,आहे .
तसेच अभिनेते भारत गणेशपुरे ..यांनी -कवितांची गाणी व्हावी "ही व्यक्त केलेली इच्छा आहे.
जेष्ठ साहित्यिक कवी "सुजन "(गझलकार- श्रीकृष्ण चंद्राकांत कीर ),यांनी कवितांच्या उल्लेखासाहित दिलेलेया रस-ग्रहण शुभेच्छा आहेत .
,"हिंदी-साहित्यिका -अनिता नाईक यांच्या शुभेच्छा ",मित्र-किशोर बळी यांच्या शुभेच्छा ,
या सोबतच
आम्ही लेखिका " या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - मोहन कुलकर्णी ..यांनी कवयित्रीच्या कवितांचे ,लेखन प्रवासाचे केलेले कौतुक आणि आनंद " आहे.
याशिवाय कवयित्रीचे "जरासे मनातले .."हे मनोगत आहे.
ही अशी इतकी विविधता असतांना -मग .. माझ्या या परिचय लेखात ..मी पुन्हा कविता ओळींची उदाहरणे देणे " म्हणजे पुनरुक्ती करण्यासारखे आहे,
त्यामुळे या संग्रहातील कवितांची उदाहरणे देण्याचे टाळीत फक्त निशा डांगे यांचे "कवयित्री म्हणून त्यांच्या कवितांत मला जे जे जाणवले ते थोडक्यात
सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखिका -कवयित्री - निशा डांगे यांच्या लेखन -प्रवासास शुभेच्छा
चित्रकार - अरविंद शेलार यांनी संग्रहाच्या शिर्षकानुरूप असे सुरेख ,आकर्षक असे मुखपृष्ठ केले आहे आहे.त्यांच्या कामगिरीला आदरयुक्त सलाम .
परीस पब्लिकेशन -सासवड , यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - 9850177342
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कवयित्री -लेखिका
निशा डांगे
पुसद - जि.यवतमाळ
संपर्क- 8329065797
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुग्धायणी-कविता संग्रह
निशा डांगे,
पृ. १२० , मूल्य- रू- १४०/-
प्रकाशक -
परिस पब्लिकेशन ,
सासवड , ता.पुरंदर , जि.पुणे.
संपर्क - 9049657965
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Like
Comment