Saturday, January 4, 2020

पुस्तक-परिचय लेख- ललित लेख संग्रह - कवडसे सोनेरी ...अंतरीचे !

पुस्तक-परिचय लेख- 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------
भावविश्व संपन्न करणारे लेखन - " 
ललित लेख संग्रह - 
कवडसे सोनेरी ..अंतरीचे  ! -
------------------------------------------------------------------------------------------
प्रसन्नचित्त करून टाकणारे लेखन -वाचनास मिळणे " वाचकांसाठी हा नक्कीच  एक खूप वाचन-आनंद योग असतो .ललित लेखनात हे सामर्थ्य 
असते ", याची अनुभूती एक वाचक म्हणून मी नुकतीच अनुभवली ..
या  ललित लेखसंग्रहाचे नाव आहे  "कवडसे सोनेरी ..अंतरीचे  ! याचे लेखक आहेत   लेखक-कवी -विस्वास देशपांडे . त्यांचे हे पहिलेच पुस्तक .
.
लेखकाविषयी  अधिक सांगावेसे  वाटते की -
चाळीसगाव येथील - आ.बं. हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते .कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी इंग्रीजीचे अध्यापन केले .
 "आदर्श शिक्षक " पुरस्काराने  सन्मानित  विस्वास विष्णू देशपांडे - म्हणजे  एक विद्यार्थीप्रिय शिक्षक " ही त्यांची खरी ओळख आहे .
इंटरनेटवर म्हणजेच .. फेसबुक आणि त्यावरील  विविध साहित्यिक समूह या सोशल माध्यमावर सुद्धा देशपांडेसर सात्याने विपुल लेखन  करीत असतात .
"प्रभातपुष्प ," "विचारप्रभात " ,संवादिनी " या त्यांच्या काही लोकप्रिय लेखमाला आहेत.

वाचन, लेखन, प्रवास आणि संगीत हे विश्वास देशपांडेसरांचे आवडते छंद आहेत . त्यांच्या या छंदास आणि आवडीस .त्यांच्यातील .अभ्यासपूर्ण ,चिंतनशील 
आणि सहजतेने काही  चांगले  सांगावे  अशी आंतरिक तळमळ असणार्या  हितचिंतक -शिक्षकाची साथ लाभली आहे .
नेमक्या या विशेष गुणांमुळे ..या लेखनातून एक व्यासंगी जेष्ठ मार्गदर्शक संवाद साधतो आहे असे जाणवत राहते .

काही वेळा आपण असे म्हणतो की ..लेखक आणि त्याचे लेखन ..खूप नशीबवान असते .ज्या पुस्तकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले असते ,ते पुस्तक ,
त्यातील लेखन अल्पावधीतच वाचकप्रिय ठरते ", देशपांडेसरांच्या या संग्रहाबद्दल अगदी असेच म्हणावेसे वाटते . सगळीच भट्टी मस्तपैकी 
जमून आलेली आहे . १६७ पृष्ठांच्या या ललित लेख संग्रहात ..५४ लेख आहेत ..एका पेक्षा एक असे सरस लेख आहेत.

या संग्रहास प्रस्तावना दिली आहे  ..प्रा.प्रवीण दवणे यांनी .  जे स्वतःच एक उत्तम ललित लेखनकार आहेत,  लेखक विश्वास देशपांडे यांच्या 
ललित लेखनाबद्दल लिहितांना त्यांनी  जे विचार व्यक्त केले आहेत ..त्यातून ललित लेखन "या लेखन-प्रकाराबाद्ल आपल्याला माहिती होते आणि 
लेखक विश्वास देशपांडे यांच्या या  लेखनाचे  व्यापक असे साहित्यिक स्वरूप आणि त्यातील सौंदर्य उलगडले आहे.
प्रा.दवणे सर म्हणतात..
"अंतरीचे हे सोनकवडसे ..एकाएकी प्रगट झालेले नाहीत . त्यामागे तीन तपांचे जीवनचिंतन आहे. अध्यापनाच्या व्यवसायाने दिलेले मनन आणि त्या आधी 
निरीक्षणाची शिदोरी आहे. जगण्या बद्दलचा  सकारात्मक दृष्टीकोन व विश्वास हाहि विश्वास देशपांडे यांच्या प्रस्तुत लेखनाचा  विशेष आहे. मनाला उभारी देणाऱ्या 
प्रकाशात्म्क  लेखांमुळे या ग्रंथाला समुपदेशात्मक लेखनाचं वेगळ मूल्य प्राप्त झालं आहे . हे सोनेरी कवडसे जीवनातील शाश्वत मुल्यांकडे घेऊन जातात ,
हे मला महत्वाचे वाटते. "

या लेखनाचा एक वाचक म्हणून मला काय वाटले - तर ,
मी माझ्या शाळेत असतानंचे दिवसच मला पुन्हा या पुस्तकाच्या निमित्ताने आठवले ..कारण ..एखाद्या दिवशी वर्गावर एखाद्या तासाला नियमित शिक्षक येऊ शकले नाही 
की तो तास साक्षात हेड-सर घेत असत .आणि त्या तासात जे काही कानावर पडायचे ",ते कायमचे मनात साठवले जायचे ", .
अग्दी तसेच मी हे लेख वाचत असतांना अनुभवले ..कारण लेखक - विश्वास देशपांडे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते ",  मुख्य म्हणजे हेड-सर होते "
या पुस्तकातील एकेक लेख म्हणजेच या हेड - सरांनी घेतलेला तास आहे ", आणि  वाचक सहजपणे या सरांचा विदार्थी होऊन जातो.

असे विलक्षण आणि वेगळे असे काय आहे या लेखनात ?
सहजता आहे, आत्मिक -जवळीक साधणारे हितगुज आहे, मोठ्या व्याक्तीमात्वाब्द्द्ल व्यक्त होतांना आदरभाव कसा असावा याचे उदाहरण आहे. सामन्य व्यक्ती असो 
वा असामन्य व्यक्तिमत्व असो ..दोन्हीबद्दल अंत:करणपूर्वक जपलेली कृतज्ञता आहे, जी व्यक्त करतांना या लेखनातून आदर्श -व्यक्तिमत्व साकारले गेले  आहेत..


लेखक विश्वास देशपांडे ..स्वतःच्या लेखनाबद्दल म्हणतात -
आशावादी आणि सकारात्मक विचात ठेवून जीवनाला आनंदाने सामोरे जायचे असते . माझ्या या सगळ्या लेखांमध्ये असाच प्रकारची सकारात्मकता ,आशावाद आपल्याला 
आढळेल . निरासेचा ,दु:खाचा स्वर आढळणार नाही ".
सरांच्या या मनोगतातून एक स्पष्ट झाले आहे की.. जीवनात शोधायचा तो आनंद , यश, कार्यपूर्तीचा आनंद , स्वप्नपूर्तीचा आनंद, कठोर परिश्रमांना मिळालेले रसाळ फल ,
हे सगळ वाट्याला केव्हा येतं ? , त्याच्याच यशोगाथा म्हणता येतील असे अनेक लेख या संग्रहात आहेत.

हे सर्व लेख अगदी नेटके आणि सुबक आकाराचे आहेत. त्यातील विषयाला अन्रुरूप असे शीर्षक ,आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी सांगतांना जी आस्था असते , त्या आस्थेतुंच 
लेखक पूरक माहिती देतो , आणि त्या माहितीचा आपल्या मनावर सकरात्मक परिणाम होईल .असे चिंतनपर भाष्य करून लेखाचा शेवट करतो..
खरेच ..हे सर्व परिणामकारक असे लेखन आहे.
साहित्य , संस्कृती , लोककला , संगीत , समाजिक पर्यावरण , व्यक्ती-विशेष ..यात सर्व क्षेत्रातील अलौकिक ,असामन्य , थोर ,कीर्तिवंत आणि लोकप्रिय व्यक्तींबद्दल "
असे लेख आहेत .. ही अशी विविधता म्हणजे लेखकाच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवणारे आहे.

लेखन मजकूर -  उदाहरणे देणे म्हणजे.. पुस्तकाचे वाचन अगोदरच केल्या सारखे होईल ,कारण तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचावे असे आहे .म्हणून या ठिकाणी मी 
काही लेखांची शीर्षके - आपल्याला सांगतो..
स्वप्न साकारले " (पृ..१६ ), "सोशल मिडीया : एक दुधारी शस्त्र  (पृ.२५ ), 
एक अवलिया गायक - किशोर कुमार (पृ..४१ ) , " लाईफ इज ब्युटीफुल  (पृ..४६ ), "विंदा : कवीमनाचा माणूस  (पृ,५२ ), , "एक दुजे के लिये - (पृ.६४ ),
"बापमाणूस - (पृ,७६ ), " रहस्य गीतारहस्यच  - (पृ,८२ ), "मन प्रसन्न करणारी गाणी ..(पृ.९० ), " आपल्या मुलांचे पालक व्हा ..मालक नको  (पृ. १०२ ),
गदिमा आणि गीतरामायण  ", (पृ..१०६ ), तरुणांनी ज्ञानेश्वरी का वाचावी ? (पृ.१३४ ),  गानसरस्वती  "(पृ..१४८ ), गानसम्राज्ञी  (पृ..१५८ ).

विश्वास देशपांडेसर, तुमच्या या लेखनाने खूप आनंद दिलाय , तुमच्या आगामी पुस्तकाची प्रतीक्षा आहे, त्यासाठी शुभेच्छा .

कवडसे सोनेरी ..अंतरीचे  !, संग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ करणाऱ्या कलावंत  चैताली नाचणेकर यांच्या कामगिरीचे खूप खूप कौतुक केले पाहिजे .

पुण्याच्या विश्वकर्मा पब्लिकेशन यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  पुस्तक-परिचय लेख- 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------

ललित लेख संग्रह - 
कवडसे सोनेरी ..अंतरीचे  ! -
पृ -१६७ , मूल्य-रु.२२५ /-
ले- विश्वास देशपांडे 
संपर्क -९३७३७११७१८ 
------------------------------------------------------------------------------------------
प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे.
संपर्क - ९१६८६८२२०० 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक -परिचय - कविता-संग्रह - "दिती "

पुस्तक-परिचय लेख - 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------
निसर्ग आणि माणूस यांच्यातील भावबंधांचे इंद्रधनुष्य...!
कविता -संग्रह -
 दिती - 
-जयश्री दाणी
----------------------------------------------------------------

कवयित्री म्हणून जयश्री दाणी इंटरनेटवर आणि प्रिंट मिडिया मधून सातत्याने साहित्य - लेखन करीत असतात .
त्यांच्या काव्यलेखनाचा अविष्कार वाचक-मित्र गेल्या अनेक वर्षा पासून पाहत आहेत , त्यांच्या लेखनास आणि  कवितांना खूप  प्रतिसाद मिळत असतो, हे 
कवयित्री -साठी खूप प्रेरक असेच आहे.

नागपूरस्थित लेखिका -कवयित्री जयश्री दाणी हे नाव सर्वपरिचित आहे .आपल्या लेखनाने त्यांनी स्वताचा असा एक वाचक परिवार 
 निर्माण केला आहे . या परिवारातील मी देखील एक वाचक-सदस्य आहे.
 "पहिला कविता -संग्रह " असा विशेष उल्लेख करून ..त्यांच्या "दिती " या कविता संग्रह बद्दल अभिप्राय देणे "एक,
आनंददायी असे आस्वादक -कार्य आहे .
 .दिती " कविता -संग्रहात  एकूण नव्वद (९०) कविता आहेत.. अभंग- ओवी , हायकू , मुक्तछंद "या प्रकारातील  या रचना आहेत.
यातील बहुसंख्य रचना छोट्या-मोठ्या अशा ही आहेत . प्रकार कितीही आणि कोणते ही असो..
या कवितेतला  " माणूस,आणि  निसर्ग , यांच्यातील  भावबंध थेट मनाला भिडणारे आहेत.

 या बद्दलची ही अगदी समर्पक ओळ- म्हणजे या 
कवयित्रीचे मनोगतच आहे -
"जितकी जखम खोल 
तितकी कवितेत ओल "

मग ,या जखमा कशाच्या आहेत ? जखमा कुणी दिल्या, कुणी केल्या या जखमा .. याचे उत्तर संग्रहातील कवितेतून मिळते, जे मनाला चटका 
लावणारे असेच आहे. कवी-मनाचे जे विशेष आपल्याला जाणवत असतात ..ते  जयश्री दाणी यांच्या कवी-मनात आहेत. निसर्ग , प्रेम, स्त्री -जीवन,
समाज आणि आपण , त्याने व्यापलेला आपला अवकाश , त्यातील भले-बुरे असे खूप काही ,या बद्दल कवयित्री अतिशय भावूक,होऊन लिहिते, व्यथित 
मनाने लिहिते ..हे जाणवते , सामाजिक भान ,खोलवर रुजलेली एक सर्व-समावेशक जाणीव ..यातून  व्यक्त होतांना दिसते.
यात भर घालून मला एक जरूर सांगावेसे  वाटते ..की -

माणूस वरवर कसा असतो ,
हे महत्वाचे नाही ,
जर - तो कवी असेल तर, 
आतून खूप खोल खोल असतो ",

कवयित्री -जयश्री दाणी यांच्यासाठी या ओळी अगदी समर्पक आहेत..

आपले जगणे .आपण शब्दातून व्यक्त करतो ,याचे माध्यम कविता असेल तर.. हे सगळे सांगणे .ज्या शब्दातून येते ..ते खूपच अर्थ-वाही "
असावे लागतात ",आणि शब्दांचे हे प्रव्हीपण ", जयश्री दाणी यांच्या कवितांचे एक ठळक विशेष  आहे.

मौन असलेल्या मनात ही एक संवाद सुरु असतो .हा शोध असतो .आपल्या सभोवतालचा .कवीची .अशीच अवस्था आहे..

" मौनाच्या सुरावटीवर हळूच 
कोण सोडून जाई थेंब हळवा
दुखर्या भागातही सर सरे 
उमलतांना थांबलेला फुलवा ... ( कविता ..पृ..८९ ),

कवयित्री जयश्री दाणी.सतत माणसाच्या सुख-दुखा बद्दल विचार करतात , माणूस आणि निसर्ग हा या कवितांचा "चिंतन-विषय आहे ",
त्या सतत ..कानोसा " घेत असतात ..तो असा ..
"कशाच्या मोहाने 
काय  ठेवलेय 
पहा , यातनांना
पंख फुटलेय...... ( कानोसा ..पृ.२० )..,

कळाहीन आयुष्य वाट्याला आल्याची खंत , या कवितेतून येते ..
"शब्दहीन काळा आली 
त्या फुलाच्या झुडुपाला 
साव्लीचेच वावडे 
न सरणार्या उन्हाला  ... ( उन्हाला..पृ..२४ ),

अबोध असे रम्य-बालपण ,शैशव ही अवस्था आपण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आठवतो, प्रत्येकाला आपल्यातले "एक मूल "
खुणावत असते .. काय होतं अशा वेळी,, त्याची ही कविता ..

" प्रत्येकजण झोपतांना 
लहान तान्हं मूल होतं 
आठवणीच्या पारावर 
काळ पांढरं ss  धावतं .... ( तान्हं मूल..पृ...३२ ), 

अशी अवस्था ,जी पुन्हा  न परतणारी आहे  ,काय करावे अशा वेळी ? तर.. मनाची अवस्था "एकल मग्न " व्हावी ..

"या एकल मग्न दिशेत 
लाज कापरा सुवास 
माळून गेली कधीचीच 
गोंडस गुलाबी आस ...... ( एकालमग्न ...पृ..३६ ),,

माणसाच्या चेहेर्यावर जे दिसत नाही , ते डोळ्यात दिसते ..या बद्दलची ही कविता खूप छान आहे.

"डोळे बोले काहीबाही 
जैसा पाउस निर्मोही 

डोळ्यात करुण श्लोक 
दुखा;त आनंदलोक  .. (डोळ्यात ..पृ..८६ ), 

उडते पक्षी " या कवितेतील .पक्षी..म्हणजे आजचा आपल्यातील बदलून गेलेला माणूस नाही ना ?
या बद्दल कवित्रीला प्रश्न पडतो .तो खूप अंतर्मुख करून जातो..

एकही पान नसलेल्या 
वाळक्या उंच काळ्या कथ्या
झाडावर 
संयान्काली जेव्हा असंख्य 
काळे पक्षी जमत असतील 
तेव्हा काय नेमके बोलत असतील ? (..उडते पक्षी ..पृ..७२ ),,

कवयित्रीच्या कविता लेखनाचे विषय .निसर्ग आणि माणूस हा आहे, यातील एकरूपता किती विलक्षण आहे, हे सांगणाऱ्या कविता
बोलक्या आहेत.. निसर्ग-चक्र , ऋतू-चक्र , दिन- चक्र ..,पाउस, ऊन, पहात, दुपार , संध्याकाळ , रात्र , उजेड, प्रकाश , अंधार ,
चांदणे .. या भवती आपल्या आयुष्याचे  रहाटगाडगे " कसे फिरत असते ..याची अनुभूती देणाऱ्या कविता संग्रहाच्या मौलीक्तेत भर घालतात.
काही शीर्षके -
ऋतू "(पृ.२५ ",)  "वसंतखुणा  (पृ.२८ ) , "आभाळ "(पृ.४४ ), सांजफुल (पृ.४५ ), आकाशरंग (पृ.५१ ), " पिवळ्या फुलांची गल्ली (पृ.५३ ),
संध्यामग्न  (पृ.५७ ), , "झाड,' (पृ, ६४ ), मुलींचा गुच्छ " (पृ,६६ ), बर्फाळलेली  दुपार (६९ ),  "दिवे लागण ( पृ.७३ ),, नभी चांदणे वाजले "(पृ.८८),

काही संवादी कवितेतून  आणि काही अतिशय मोजक्या ओळीतून ,..या कविता आपल्याशी भावूक ,हळवे मनोगत व्यक्त करतात ,
कवयित्री- जयश्री दाणी यांच्या सहज लेखन - शैलीचे कौतुक केले पाहिजे . भावनिक गुंता किती कठीण आणि किचकट असतो , याची कल्पना 
आपल्या सगळ्यांना आहे, अशा विषयावर असे सहजपणे लिहिणे , ते योग्य शब्दात मांडणे सोपे मुळीच नसते , असे असल्यामुळे ,
कवयित्री- जयश्री दाणी यांच्या सहज लेखन - शैलीचे कौतुक केले पाहिजे   .
"दिती " कविता संग्रह त्यांचा पहिला कविता संग्रह आहे, या पुढे त्यांच्या भाव-कवितांचे असेच सुरेख संग्रह येत राहोत या शुभेच्छा देतो.

या संग्रहात - कविते सोबत रेखाटने आहेत त्याचे चित्रकार आहेत.अमरावतीचे कलावंत - उद्धव शहाणे .
नागपूरच्या व्ही.कांचन .यांनी संग्रहाचे अनुरूप असे मुखपृष्ठ केले आहे 
या दोन्ही कलाकारांचे अभिनंदन.

अमरावती येथील - शब्दजा प्रकाशनाने  "दिती " कविता संग्रह प्रकाशित केला आहे.त्यांचे आभार मानू या.

 कवयित्री जयश्री दाणी यांचा  "दिती "  हा पहिला कविता संग्रह आहे, या पुढेही  त्यांच्या भाव-कवितांचे असेच सुरेख संग्रह येत राहोत या शुभेच्छा देतो.  
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  पुस्तक-परिचय लेख - 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------------
कविता -संग्रह -
 दिती - -जयश्री दाणी
पृ.९० , मूल्य- रु.१५० /-
----------------------------------------------------------------
प्रकाशक -
राजेश  बहाळे
शब्दजा प्रकाशन 
संपर्क - ९२२५२२३८०० 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, January 2, 2020


पुस्तक परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------
बाल-कविता संग्रह- थेंब फुले - "
सुंदर काव्य-पुष्पांची बाग  !
-----------------------------------------------------------
मराठवाड्यातील बालसाहित्य लेखन क्षेत्रात .अनेक लेखक-कवी मंडळी मोठ्या जाणीवेने लेखन करतांना दिसून येत आहेत ,ही बाब
मोठी समाधानाची आहे. नव्या पिढीतले हे साहित्यिक ..शिक्षण -क्षेत्रातले  असल्यामुळे .."एक शिक्षक-एक गुरु
आणि एक माणूस म्हणून " ते सतत मुलांच्या सानिध्यात आणि सहवासात असतात . याचा खूप मोठा लाभ त्यांना आपल्या लेखनासाठी
नक्कीच होत असतो.  
नांदेड  जिल्ह्यातल्या  सावरगाव या लहानशा गावात असलेले  श्री.एकनाथ डूमणे असेच एक शिक्षक .जे कवी पण आहेत - ,
त्यांचा बालकविता संग्रह - थेंब फुले प्रकाशित झाला आहे ,त्याबद्दल लिहितांना खूप आनंद होतोय ...
बालसाहित्य त्यात ही कविता  म्हटले की त्यात कोणते विषय असणार,? तेच ते नेहमीचे ठराविक आणि .ओळखीचे विषय असणार ...
हो अगदी बरोबर आहे हे ..
पण ,एक गोष्ट अशी पण असते की ,सर्वांच्या नजरेला ज्या गोष्टी पडत असतात , त्याकडे पाहण्याची प्रय्तेकाची दृष्टी वेगळी असते, दृष्टीकोन वेगळा असतो
.हे लक्षात घेत आपण वाचन करीत गेलो तर .   कवी- एकनाथ डूमणे यांच्या  .थेंब फुले "या संग्रहामधील कवितांचा आनंद घेता येतो.
थेंब फुले - " या बाल-कविता संग्रहाला   " कवीचे मनोगत ,नाही ",  आणि कुणा मान्यवरांची प्रस्तावना नाहीये .." या दोन्हींचे नसणे ",जाणवत नसले तरी,
वाचक-सवयीने आपल्याला  जाणवते की अरेच्या ..हे दोन पाने यात नाहीत ,पण ,  हा बदल छानच वाटला .
प्रसिध्द साहित्यिक श्री. दा.मा.बेंडे - यांनी मलपृष्ठावरील आपल्या शुभेच्छा- अभिप्रायात या संग्रहाविषयी उचित असे गौरवोद्गार व्यक्त केले आहेत.
ते म्हणतात -
एकनाथ डूमणे शिक्षक आहेत . या कवितेत बाल-विश्वाची बोली त्यांनी बरोबर पकडली आहे.. ग्रामीण जीवन बाल कवितेतून चितारण्याचा आणि
बालमनाचा कानोसा घेण्याचा , त्यांच्या कवितेने यशस्वी प्रयत्न केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही..
कवितेसाठी निवडलेले आशय आणि  विषय , आणि रचना बालवाचकांना पसंतीस पडणाऱ्या आहेत.
वरील मजकुरा वरून  प्रस्तुत कविता संग्रहातील कवितांच्या स्वरूपा बद्दल कल्पना येण्यास नक्कीच मदत झाली आहे. पाहू या काही कविता उदाहरणे -
थेंब फुले " या कविता संग्रहात एकूण छत्तीस  कविता आहेत.
पाऊस" म्हणजे बालमनाचा एक आवडता सोबती .. पाऊस आला आला म्हणता म्हणता तो येतो आणि जातो ,
त्याची ही शीर्षक कविता - थेंब फुले -(पृ.८ ),
थेंब पडती
टप टप टप
गारा वर्षती
रप रप रप 
थेंब फुले
होती जमा केली
दिसेनाशी झाली
सांगा कुठे गेली ?
*****
आजच्या नव्या पिढीला आणि बाल-मनाला ,आपल्या पारिवारिक नात्यांची पूर्णपणे माहिती नसते, कारण छोटी कुटुंबे .!
अशा वेळी कवी -एकनाथ डूमणे
मुलांना  "नाते " (पृ ..१४ ) ,या कवितेतून आपल्या सभोवताली असणार्या अनेक नाते-रूपांची फार छान ओळख करून देतात. ही कविता पूर्ण वाचण्यात खूप मजा आहे.
आमच्याकडचे एका नाते
खरे तुम्हा सांगून जाते
बाबांचे बाबा पितामह
आईचे बाबा मातामह ...
**********
आजच्या ग्रामीण जीवनात आपले अनेक सोबती कमी झाले आहेत , वेगवान यंत्र आणि वाहने आपण वापरतो , पण ही येण्या अगोदर कोण आपले
"सोबती " ( ..२१ ) असायचे .त्याची ही सुंदर कविता  आहे..
"शेत कामाला
राबताय कोण ?
आमच्या घरची
बैल  दोन   !
काळीचे लेक
सच्चे कोण ?
बैलंच आमचे
दुसरे कोण ?
*******
आपल्या सर्वांच्या भाव-विश्वातली महत्वाची व्यक्ती  "आई" असते , तिच्या विषयीची ही कविता
"पहाटेच सुरु
आईचे राबणे
माहितच नाही
जराही थांबणे
दुखनं खुपणे
इतरांचं पाही
तिचं सोसण का ?
समजत नाही  .... ( आई ..पृ..३४ ),
आपल्या सभोवताली निसर्गाने दिलेल्या अनेक सुंदर गोष्टी आहेत, कवीने ते बरोबर टिपले आहे..
"झाडाच्या शेंड्याला
लागले बगळे
कौतुकाने किती
बघती सगळे
हिरव्या रंगाची
पानं असतात
बगळ्यांची फुलं
पांढरी दिसतात ......(बगळ्यांची फुलं .पृ..३६ ), "
या आणि इतर कवितातून परिसर दर्शन होते, अनेक मित्रांच्या भेटी होतात , मोठी माणसे काही तरी सांगून जातात ,
या अशा कवितेतून ..काही घेत राहावे ..ज्याने आपल्या मनाला काय वाईट आणि काय चांगले याची ओळख  होण्यास मदत होते.
एक शिक्षक आणि एक कवी ..अशा दोन्ही रुपात एकनाथ डूमणे यांनी केलेले प्रबोधन उत्तम आहे.
मनी माऊ, " "उंदीर ", घोडा ", मुंगी ", "कोंबडा ", मेंढी "  "सभापती   " मावशी ""या कविता .गंमतीदार कविता आहेत ..
आजी, डॉक्टर मामा , परी , आई  " या कविता मधून आपल्या आवडत्या व्यक्ती भेटतात.
"इशारा , थेंब फुले , ढग , पाउस , झाड " या कविता वाचतांना निसर्ग रूप दिसते ...
कवी - एकनाथ डूमणे यांनी लिहिलेल्या साध्या आणि सोप्या शब्दरचनेच्या या कविता वाचकांना नक्कीच आवडतील.
त्यांच्या लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा .
प्रसिध्द चित्रकार प्रा.प्रमोद दिवेकर यांनी  या  कविता संग्रहाचे  "आकर्षक ,सुंदर मुखपृष्ठ आणि आतील अनुरूप रेखाचित्रे  केली आहेत ,
त्यांच्या या कामगिरीने  "थेंब फुले " खूप सुरेख झाले आहे. त्यांचे अभिनंदन.
प्रकाशक -दादासाहेब काका जगदाळे यांच्या तेजश्री प्रकाशन -. यांनी हा बालकविता संग्रह प्रकाशित केला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  पुस्तक परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------
बाल-कविता संग्रह-
थेंब फुले - "
एकनाथ डूमणे
संपर्क - ९०९६७१३४१७
पृ..३६, मूल्य- रु.५०/-
------------------------------------------------------------------------------------------------------
तेजश्री प्रकाशन -
संपर्क - ८२७५६३८३९६
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------