Saturday, January 18, 2014

पुस्तक-परिचय- कथा- संग्रह...मनातल्या वावटळी ....!

पुस्तक -परिचय :
अरुण.वि.देशपांडे-पुणे.-
-------------------------------------
भावनिक कल्लोळाच्या कथा "-"मनातल्या वावटळी "-
----------------------------------------------------------------
पुस्तक रूपाने येणारे लेखन लेखक-कवीचे वाण्ग्मयीन व्यक्तिमत्व साकारणारे असते. याचा परिणाम वाचकांच्या
मनावरती दीर्घकाळ रेंगाळणारा असतो. त्यातच लेखक-कवीच्या "पहिल्या पुस्तकाची बात कांही औरच असते.असा
अनुभव लेखिका-प्रगती कोलगे त्यांच्या "मनातल्या वावटळी " या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने घेतच असतील.
"ग्रंथाली "या मान्यवर संस्थेने प्रगती कोलगे यांचा कथा-संग्रह नुकताच -जुलाई -२०११ ला प्रकाशित केला आहे.
त्याचा हा स्वागतपर परिचय सानंद करून देतो आहे.
या संग्रहात एकूण ९ कथा आहेत.कथांमधील व्यक्तीरेखा वाचकांशी निवेदनातून संवाद साधतांना -आपापल्या जीवनतील
भावनिक घटना,प्रसंग ,व्यक्ती-संदर्भ आठवणी सांगतात.या निवेदनात्मक कथेतून एक समान भावनिक धागा आहे
असे जाणवते .हा धागा आहे तो "मनात कल्पिलेले असे कांही आणि वाट्यास आलेली जीवनतील वास्तव " यातील
तफावतीने उध्वस्त: मनाने आयुष्याला सामोरे जाताना -मनाची झालेली अवस्था ,भोगावे लागणारे ताण-तणाव ,विचार,आणि
भावना यांच्याशी करावी लागणारी यातानाकारक तडजोडी -आणि यामुळे सामाजिक व्यवहार -आणि भावनिक व्यवहार यातील
संघर्ष कराव्या लागणाऱ्या व्यक्तींची भावनिक ससेहोलपट -असे अनेकविध कंगोरे टिपणे आणि त्यावर भाष्य करणे -हे
लेखिका-प्रगती कोलगे यांचा पहिला लेखन-प्रयत्न जमून आलेला आहे.असे म्हणावेसे वाटते.
'कृष्णा( कान्हा देवकीचा की यशोदेचा),रागिणी (जनम पत्रिका आणि लग्न),माया (लादलेला संसार),वर्षा-(ओढ हक्काच्या -
संपूर्ण प्रेमाची),सुहास -(अज्ञात वास्तव).या काही कथांचे उल्लेख करावेसे वाटतात.
माणसांची नाजूक स्वप्ने,त्यांच्या कोमल भावना ,सहजीवनाची रंगबिरंगी चित्र, या सर्वांची झालेली निराशाजनक होरपळ
मनातली वावटळी "मधील कथांचे विशेष आहे.
कृष्णाचे दुखः: ,माधवीची कथा,वर्षाची व्यथा ,माणिकराव यांची अपेक्षा ,नितीनच्या अधुऱ्या प्रेमाची विफलता ,हे या कथा लेखनाचे
विषय आहेत.केवळ नशीब-आणि नियती यामुळे भोगावे लागणारे दुख:,त्यामुळे हे माणसे अगतिक,हतबल,आणि नैराश्यग्रस्त होऊन
जगण्याला सामोरी जात आहेत असे चित्र उभे राहते.त्यामुळे नकारात्मक भावनाचे सावट दाटून आले आहे ,असे वाचकांना जाणवेल.
लेखिका प्रगती कोलगे यांनी अतिशय समरसून लेखन केले आहे.आपल्या भोवती असलेल्या माणसांविषयी असलेलेल्या आस्था
त्य्नाच्या कथेतून दिसून येते.कथानकातील व्यक्तिरेखांना लेखिकेचे पाठबळ लाभल्यामुळे की काय ,या कथांमधून भावनिक-
आणि वैचारिक अशा दोन्ही भावनांचे चमकदार शब्दरूप पहावयास मिळते.
लेखिका प्रगती कोलगे यांचे या लेखन उपक्रम बद्दल अभिनंदन.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय-अरुण.वि.देशपांडे.-पुणे.९८५०१७७४२.
"मनातल्या वावटळी "-कथा संग्रह -लेखिका-प्रगती कोलगे
प्रकाशक :ग्रंथाली-मुद्रण सुविधा केंद्र
संपर्क :०२२-२४४७४८४३,

पुस्तक-परिचय - परीघावरच्या पाउलखुणा ...!

पुस्तक परिचय...||                           ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

---------------------------------------------------------------------------------------
"परीघावरच्या पाउलखुणा -
मनाला व्यापून टाकणाऱ्या जीवनानुभावांचे
लेखन "
-----------------------------------------------------------
सांगोला -जि-सोलापूर चे ख्यातीप्राप्त साहित्यिक प्रा.डा.कृष्णा इंगोले
यांचे विपुल असे लेखन विविध लेखन  ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेले आहे.
तसेच अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केलेले आहे.
"परीघावरच्या पाउलखुणा "-हे इंगोलेसरांचे नवे लेखन हे ललित गद्य लेखन
आहे.जीवन-अनुभवांचे हळुवार आणि भावनात्मक जाणीवाचे लेखन म्हणजे
ललितलेखन" असे म्हटले जाते. या प्रमाणे "परिघावरच्या पाऊलखुणा " मधील
लेख हे ललित शैलीतील आणि कथात्म असे असले तरी या लेखनाला महत्वाचे
असे विविध सामाजिक परिवर्तनाचे संदर्भ आहेत.
निखळ रंजनात्मक असे हे लेखन नसून व्यक्तीजीवनाची
वाटचाल करतांना ,सभोवतालच्या समाज जीवनातील
घडामोडींची,त्यातील बदलांची नोंद घेत असतांना ,लेखक  
ज्या भावनेने आणि वैचारीकतेने व्यक्त होतो, जाणिवांचे
हे  शब्दरूप अंतर्मुख व्हायला लावणारे आहे.या लेखनाचे
हे एक प्रमुख वैशिष्ट्य ठरावे.
विकासाच्या केंद्रस्थानी असणारी शहरे आणि या साठी
विन्मुख्लेला खेड्यातील माणूस-यांच्यातील भली मोठ्ठी तफावत
या लेखनाचा आस्थाविषय आहे."परिघावरच्या पाउलखुणा "
मधील लेखनातून हे प्रकर्षाने जाणवेल.
एका सामान्य माणसाच्या जीवन-प्रवासतील बऱ्या-वाईट,इष्ट -
 अनिष्ट  यावर लेखक फार सुंदर  भावनिक व्यक्त होतात. या
लेखनात कथा आणि ललित लेख वाचावयास मिळतात. एकूण १६
लेख आणि कथा यांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.
लहानसे खेडे आणि पुढारलेले शहर हा परीघ आणि यातील माणसांचे
चिंतनपर चित्रण लेखक  अतिशय समरसतेने करून जातात.
जुने-लोक ,जुने दिवस  या गोष्टी म्हणजे स्मरण रंजन करणाऱ्या
पण या लेखनात हेच विषय लेखकाचे चिंतन-विषय झालेले आहेत.
यात खंत आहे,विषाद आहे,चांगल्या गोष्टी नाहीश्या होत असल्या
बद्दलची जशी खंत आहे, त्याच बरोबर नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करणारी
भावना देखील आहे."
"कथा हुकलेल्या लग्नाची ", "जयंती ", विचका ", "पाणी " या कथा  आणि
"परिघावरून केंद्राकडे  जाताना ",आवटे आबा ", चुकलेल्या वाटा ", अशा
लेखांतून लेखक प्रा.डा.कृष्णा इंगोलेसर यांच्या लेखन शैलीचा सुरेख प्रत्यय
येतो.  बदल होत असतानाच्या प्रक्रियेचा परिवर्तनशील मनाने त्यांनी घेतलेला
समाजमनाचा ,समाज-व्यवहाराचा हा लेखन धांडोळा वाचकांना एक विचार आणि
अनुभव देणारा आहे.
माणसांच्या सह्वास्च्या आठवणीनी या "परिघा वरच्या  पाउलखुणा " वाचकांच्या
मनावरती ठळकपणे उमटतील हे मात्र नक्की.
औरंगाबाद च्या रजत प्रकाशन आणि प्रकाशक श्री अशोक कुमठेकर यांनी अतिशय
सुरेख पुस्तक करून लेखक -प्रा.डा.कृष्णा इंगोले यांच्या वाचकांना सुंदर भेट दिली आहे.
चित्रकर-कलावंत-सरदार  यांनी यथायोग्य मुख-पृष्ठाने भरच टाकली आहे.
"परिघा वरच्या पाउलखुणा " जरूर वाचावे असे पुस्तक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
"परिघा वरच्या पाउलखुणा"
लेखक- प्रा.डा.कृष्णा इंगोले -------संपर्क-९९२२६१७६२१
प्रकाशक- रजत प्रकाशन,
११८-तिलक नगर -औरंगाबाद-
मो-९८५०१४००२५.
पृ.-१२८ , मु-रु-१३५/.  
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
                                        पुस्तकपरिचय- अरुण.वि.देशपांडे -पुणे
                                                मो-९८५०१७७३४२,
----------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय - कादंबरी - टेन पर्सेंट ...!

श्री ||
पुस्तक-परिचय "                                        
  -अरुण.वि.देशपांडे -पुणे.
-मो.९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------------
----" मनस्वी आणि जिद्दी माणसाच्या व्यक्तीमत्वाची
      शंभर टक्के कहाणी (  - टेन पर्सेंट ) " १० %-कादंबरी .
                             ***************
विलास एखंडे पाटील या लेखकाची टेन पर्सेंट " ही कादंबरी औगस्ट-२०११ मध्ये
प्रकाशित झालेली आहे. ३०३ पृष्ठांच्या  कादंबरीत "शिवा" या तरुणाच्या एका
मनस्वी जीवन प्रवासाची कहाणी लेखकाने प्रभावी आणि प्रवाही शैलीतून सांगितले आहे.
"शिकलेला , भल्या - बुऱ्याची समज असलेला ,मानवी मुल्यांची सजग जाणीव असलेल्या
तरुणाची -"शिवाची " ही कहाणी आहे.
खेड्यातून शहराकडेघेऊन जाणारा रस्ता आणि या प्रवासातील वळण वळणाने कराव्या
प्रवासाची कहाणी लेखक-विलास एखंडे पाटील तपशीलवार रेखाटली आहे.
प्रस्तावनेत असे म्हटले आहे की-
सरकारी व्यवस्थेतील लाचखोरीच्या पद्धती, त्या यंत्रणेतील मिंधेपणा ,त्या विषयाची मनात
चीड असतांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि या प्रवाहाच्या विरोधात पोहणारी काही
मोजकी माणसे भेटल्या नंतर मिळणारा दिलासा आणि वाढणारी आशा---"
हा अवकाश  लेखक विलास एखंडे पाटलांनी चांगला पेलला आहे.
"टेन पर्सेंट" कादंबरीच्या कथानका मध्ये गेल्या पन्नास वर्ष्यांच्या
सामाजिक , आर्थिक बदलावरचे  भाष्य आणि त्यातून मनावर झालेल्या
घात-आघात यांचे  "चिंतनपर " स्वगत  नायक -शिवाच्या मनोगतातून
व्यक्त होत गेलेले आहे.
लेखक विलास एखंडे पाटील आपल्या मनोगतात म्हणतात की -
या कथानकातील सारे काही काल्पनिक आहे.तो "कल्पना "विलास" समजावा .
विशेष म्हणजे हेच सर्व घटक कथानकाला प्रभावी करणारे ठरतील असे आहेत.
कहाणीच्या ओघात येणाऱ्या-शासकीय , निम-शासकीय  संथा ,त्यांची सगळी
कार्यप्रणाली ,त्यातील कार्यरत व्यक्ती- आणि व्यक्ती समूह , आणि या सर्वांशी
अपरिहार्यपणे जोडला गेलेला नायक-शिवा . त्याच्या जीवन कहाणीला संघर्ष -
कहाणी बनवणारे  ह्या व्यक्ती , "सेंट रौन" ही संस्था ,आणि सभोवतालचे विश्व
हे नायक-शिवा" इतकेच महत्वाचे आहे. हे सगळे इतके तपशीलवार पणे येते की
ही संस्था वाचकांच्या नजरेसमोर आकारून येते.
नायक -शिवा स्वतः त्याची कहाणी सांगतो आहे. जुन्या आठवणीत रमणारा शिवा,
वर्तमानातून बोध घेता घेता ,भूतकाळातील चुकांचा हिशोब करतो, आणि त्यातून
भविष्यात नव्या पद्धतीने काम करण्याची तयारी दाखवतो. शिवाचे हे असे घडत
जाणे म्हणजे " टेन पर्सेंट "कादम्बरीचेकथानक आहे.
"टेन पर्सेंट" कादंबरीच्या कथानका मध्ये गेल्या पन्नास वर्ष्यांच्या
सामाजिक , आर्थिक बदलावरचे  भाष्य आणि त्यातून मनावर झालेल्या
घात-आघात यांचे  "चिंतनपर " स्वगत  नायक -शिवाच्या मनोगतातून
व्यक्त होत गेलेले आहे.

सर्व सामान्य माणसांच्या भाव-विश्वात सर्वच गोष्टीना मोठे
भावनिक स्थान असते. शिवाच्या मनात- "शाळेचे दिवस,गावाकडचे
दिवस,गावातली माणसे ,महाविद्यालयीन जग, त्यातील मित्र ,शिक्षक ,सर,
आणि भेटलेली वडीलधारी माणसे यांचे तर स्थान महत्वाचे आहेच, त्या पेक्षा
त्याच्या संघर्षाच्या दिवसात जमेल तशी,जमेल तितकी मदत करणारया
सोबत्यांना अधिक जवळचे स्थान आहे.
मनाच्या हतबल अवस्थेत शिवा आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणीने
विव्हल होऊन जातो, त्याची "ही आपली माणसे" त्याला संघर्ष करण्याचे सांगतात,
त्याला प्रेरणा देतात. शिवाचे हे "भावबंध" मोठे मनस्पर्शी झाले आहेत.
शिवाचे, मनोगत, शिवाचे स्वगत -या दोन्ही गोष्टी सुरेख ललित गद्य लेखनाचे
उदाहरण वाटवे असे सरस उतरले आहेत.
"टेन पर्सेंट" कादंबरी लेखन वाचकांना  जीवन -अनुभव देणारे वाटेल.
लेखक विलास एखंडे पाटील यांची कामगिरी हंड्रेड पर्सेंट आनंददायी अशीच झाली आहे.
जरूर वाचावी अशी ही कादंबरी आहे.
*********************************************************************************************
पुस्तक-परिचय "-----------------------------------
अरुण.वि. देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------
१०%- " टेन पर्सेंट -
कादंबरी --पृ- ३०३- की-रु-२५०/-
विलास एखंडे पाटील - संपर्क- ०२०/२५६६०००१.
प्रकाशक- व्हिजन प्लस फौंडेशन - पुणे.
visionplus .foundation @ gmail .com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक- परिचय*- माझ्या गझला - बदिउज़्ज़मा बिराजदार .

श्री ||                                               अरुण.वि.देशपांडे -पुणे.
पुस्तक परिचय "-                         
गझल -यात्रेतील एक दिलचस्प मकाम -
"माझ्या गझला "
-------------------------------------------------
मराठी गझल आणि कविता लेखनातील एक परिचित नाव
बदिउज्ज्मा बिराजदार -साबिर शोलापुरी",सोलापूरचे.
मराठी  गझल हिंदी मार्फत दाखल न होता सरळ उर्दूच्या
वाटेने मराठीत आली पण उर्दुचा प्रभाव न घेता मराठमोळ्या
रूपातच घडत गेली .या गझलच्या प्रवासात मुस्लीम मराठी साहित्यिकांचे
योगदान लक्षणीय आहे आणि यात कवी-शायर बदिउज्ज्मा बिराजदार
यांचे ही महत्वाचे योगदान आहे.
माझ्या गझला "हा त्यांच्या नवा संग्रह आहे. साठ गझलांचा समावेश
असलेल्या त्यांच्या संग्रहाचा हा परिचय.
आपल्या मनोगतात कवी म्हणतो आहे  की-
छंदोबद्ध रचनेच्या छंदात राहण्याचा छंद आहे म्हणूनच
माझ्या हातून "माझ्या गझलांची "निर्मिती झाली आहे."
समजातील माणसांच्या व्यथा ,आधुनिक माणसांच्या यथार्थ
संघर्ष ,सुख,आणि दुखः यांची कहाणी हा या संग्रह्तील गझलांचा
भावार्थ आहे.
गझल हा ताकदीचा काव्यप्रकार आहे असे म्हटले जाते.
आणि शायर बदिउज्ज्मा बिराजदार -साबिर शोलापुरी
यांच्या गझला या काव्य्प्रकारचा "बेहतरीन अविष्कार आहे.
वर वर पाहता हे "शेर " सभोवतालच्या वृत्ती,प्रवृत्ती, यावर
भाष्य करणारे वाटतील .पण अंतरंग उलगडले जाते आणि मग
त्यातील "पारलौकिक तत्व" आपल्या मनावर प्रभाव टाकते.
सभोवतालची विपरीत परिस्तिथी जगण्यातला आनंद
घालवून टाकणारी आहे .जीवनाच्या मांगल्याची चाड
नसलेल्या लोकांसोबतचे क्षण मनाला अधिकच वेदना देणारे
वाटतात. अशा वेळी कवी म्हणतो-
भामट्यान च्या  मैफलीला आज मी टाकून आलो
संगती ती दाम्भिकांची सर्व मी सोडून आलो ..(मैफलीला --पृ-२२)
दहशतीच्या वातावरणात जगण्याची भयावह सक्ती ज्यावेळी
होते त्यावेळी संवेदनशील मनाला होणाऱ्या वेदना ....
   -हुंदके दाबून येथे राहतो, पण दहशतीने
सावली पाहून आता चालतो,पण दहशतीने ....(हुंदके दाबून--पृ.२३)
    लागला ना अंत केव्न्हां माणसांचा
    वागणे ही  मज तयांचे ज्ञात नाही ---
कवी आपल्या प्रेरणेने या परिस्तिथी चा शोध गेतांना दिसतो -
का बेचीराग झाली पणतीत ज्योत ही
अंधारले कशाने मतितार्थ शोधतो.......(स्वार्थीच फार झाले..पृ-४३)
व्यथा ,खंत,खेद,विषाद, उपेक्षा -अशा भावनांचे गडद रंग या रचनेतून
दिसत असले तरी कवीची सामाजिक बांधिलकी  जाणवते.आणि
सभोवतालचा माणूस आणि कवी यांच्यातील आपले पानाचे नाते दिसते.
कवी बदिऊज्मा बिराजदार-साबिर- यांनी मोठ्या उत्कटतेने
या भावना आपल्या रचनेतून व्यक्त केल्या आहेत.माणूस आणि
त्याच्या व्यथा हा कवीचा काव्य-विषय आहे-त्यामुळेच तो म्हणतो- 
      डोळे भरून येती साबिर अशा व्यथेने
      हे शल्य आसवाना पण गाळता न आले.....(जे जे मनात..पृ-३०)
माझ्या गझला " या संग्रहात सामाजिक जीवन मनावरती  भाष्य
करणाऱ्या रचना अधिक प्रभावी आहेत. डा.राम पंडित यांनी कवी
बदिउज्ज्मा बिराजदार यांच्या गझलेची पाठराखण केली आहे.
गझला आणि कविता रसिकांसाठी "माझ्या गझला " हा संग्रह जरूर
वाचावा असाच आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
-परिचय- अरुण.वि .देशपांडे-पुणे.
माझ्या गझला (काव्य संग्रह)
बदिउज्ज्मा बिराजदार-साबिर शोलापुरी"- मो-९८९०१७१७०३.
प्रकाशक- सुविद्या प्रकाशन
३७४-उत्तर कसबा--सोलापूर-४१३००७.
पृ-६२           कि-रु.६०/-
***************************************************************************************