स्वागत पुस्तकाचे -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ -------
आभाळमाया -
(प्रातिनिधिक कविता संग्रह )
संपादक - डॉ.अरविंद नेरकर
------------------------------ ------------------------------ ------------
शब्द्गांधार " या सु-परिचित दिवाळी-अंकाचे संपादक अशी ओळख असलेले डॉ.अरविंद नेरकर एक उत्तम संपादक आहेत तसेच एक प्रकाशक देखील आहेत .
. अनेक लेखक -कवींच्या साहित्याला त्यांनी पुस्तकरूपात वाचकांच्या समोर आणलेले आहे.
. त्यांनी संपादित केलेला आभाळमाया हा प्रातिनिधिक कविता -संग्रह डिसेंबर -२०१५ ला प्रकाशित झाला आहे.
२२ कवींच्या प्रत्येकी ६ कविता या प्रमाणे एकूण १३२ कवितांचा सुंदर शब्द-नजराणा असा हा कविता-संग्रह आहे"असे म्हणावेसे वाटते
. हे २२ कवी आणि त्यांच्या काव्य-प्रतिभेचे विविध -रंगी स्वरूप ही एक छान अनुभूती आहे. कविता आणि त्यांचे आशय आणि विषय यांची विविधता हे ही या संग्रहातील कवितांचे वैशिष्ट्य आहे.
कवी मनास अभिव्यक्तीची ओढ असते ,आणि लिहिण्याची उर्मी कविता रूपातून येते ..यातील कवी जे विविध वयोगटाचे प्रतिनिधी आहेत -त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा अर्थातच वेगवेगळ्या आहेत. अनुभव, दृष्टीकोन ,जाणीवा यांचा परिणाम कवितेतून व्यक्त होतांना जाणवतो.
यातील सहभागी कवी या प्रमाणे आहेत-
१.जयश्री जोशी --पुणे . २- चारुशीला बेलसरे - -पुणे. ३- संजीवनी औटी -पुणे , ४- श्रीनिवास चंद्रात्रेय -तळेगाव दाभाडे ,
५-रवींद्र गाडगीळ -पुणे , ६- विजयकुमार देशपांडे -पुणे , ७, शरद अत्रे -पुणे, ८-सुनंदा कुलकर्णी -पुणे , ९-सुनिता भालेराव -डोंबिवली .
१०-भि.द .उशीर उर्फ रविकिरण- मुंबई , , ११- हेमंत परब -पुणे , १२- बाबू फिलीप डिसोजा -निगडी -पुणे.,
१३-उषा जोशी -पुणे, १४ -निर्मला जाधव -कोडोली -कोल्हापूर ,१५- गजानन प्रधान -पुणे, १६-मेधा थळे- नवे पनवेल.,
१७- पुरुषोत्तम बी.एम.कांबळे -वाशी- नवी मुंबई. १८-महालिंग शंकर मेणकुदळे- सातारा , १९-कल्पना मुकुंद कांबळे-साळवे -दादर -मुंबई,
२०-निर्मला केतकर -गोपालनगर -जि.वर्धा , २१- सुभाष गोखले -औंध-पुणे, २२- रोहिणी जाधव -बोरीवली-मुंबई.
या कवितेत लयबद्ध कविता आहेत, मुक्तछंद कविता मोठ्या प्रमाणात आहेत, गद्य -विधानात्मक अशा रचना आहेत..या कविता ओळींच्या संख्येने छोट्या -मोठ्या वाटाव्या अशा आहेत.यातून कवींनी आपले जीवन -तत्वज्ञान मांडलेच आहे , याच बरोबर काही चांगले घडावे ही अपेक्षा व्यक्त करतांना आपल्या कवितेतून त्यांचे मनापासूनचे व्यक्त होणे "जास्त भावणारे आहे.
काही कवितांचे उल्लेख उदाहरणादाखल करतो आहे-..यामुळे संग्रहातील कविता किती विविधतेच्या आहेत याची कल्पना येऊ शकेल.
आपल्या जगण्याची लढाईत मन कितीही दुखी झाले तरी ,आनंद तर शोधावा लागेल .त्यासाठी निरपेक्षपणे हे करता येईल.....कर्तव्य म्हणून...
१. तसा क्षण ही कुठेतरी भिजत
पडलेलाच असतो
रुजून वर येण्याची त्याचीही वेळ
ठरलेलीच असते
आणि म्हणूनच उगवण्याची वाट न बघता
आपण आनंदाच्या बिया पेरायच्याच असतात ...(कर्तव्य - जयश्री जोशी )
विठूमाउली आणि त्याचे भक्त म्हणजे एक वेगळे नाते आहे श्रद्धा आणि भक्तीचा संगम विठूच्या दर्शनाची ओढ अशी असते त्याची की कविता ...
२.पंढरीच्या वाटेवर पाऊलेही चालती
भक्तजनांच्या मनात विठूनाम जागृती
मन शांतविते जगन्माऊली ती
भवसागर पार करी भक्तांची नाव ती ...(विठूमाउली - चारुशीला बेलसरे )
मनाची समजूत घालणारी ,जगण्याचे भान देणारी ही रचना ...
३.न व्हायचे सप्तसुरात लुब्ध
न इंद्रधनूच्या रंगात बद्ध
मावळेल वेदना मन क्षुब्ध
हवा असा एक मायेचा शब्द ...(अपेक्षा - रोहिणी जाधव )
नारी रुपाचे यथार्थ दर्शन या कवितेतून होते.....
४. आग आहे पाणी आहे
लखलखती वीज आहे
बुरसटलेल्या विचारांनो
आजची मी आधुनिक नारी आहे ..( आदि- शक्ती..कल्पना मुकुंद कांबळे साळवे )
खंत ,विषाद मनात दाटून आल्यावर मनाची व्यथा अशा शब्दातच व्यक्त होते....
५.. वय उताराच झालं
नाव लागली पैलतीरी
परि दोन पिढ्यात उभी
अजुनी विचारांची दरी ...(कसा मी गप्प राहू ..रवींद्र गाडगीळ )
जगण्याने जे जे काही दिले त्यावर विचार न करता ,आयुष्य कसे जगावे याचे भान देणारी कविता..
६. कष्ट संकटे कायम ती तर
मनी बनवूया होड्या कणखर
तरू सोबतीने भवसागर
आयुष्य मिळाले आहे सुंदर ...(आयुष्य मिळाले आहे सुंदर ..विजयकुमार देशपांडे )
माणूस आणि नसर्ग यांच्यातील दुरावा चिंताजनक झाला आहे म्हणून या नात्याचं महत्व सांगणे ही एक जबाबदारीच ठरते ..अशी एक कविता ..
७.जीवनाचा आनंद घेण्यासाठी
अन जगण्याचा अर्थ
उमजून घेण्यासाठी
प्रत्येकानं निसर्गाशी
नातं जोडायला हवं ....(निसर्गाशी नातं ..शरद अत्रे )
८. पाउस नाही ..अवर्षण ..दुष्काळ , तहानलेली सृष्टी ..त्यासाठी ही प्रार्थना
तृषार्त व्याकुळ धरा
मृगा तू बरस खरा
प्रतीक्षा ती बीजांतरी
सुजन नवल जरा ....(वर्षायाचना ..बाबू फिलीप डिसोझा )
९/ आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांचे महत्व असाधारण असेच असते म्हणूनच त्यांच्या सहवासाचे क्षण मनात असतात ..हा भावनिक असा अक्षय साठा असतो..त्याची ही भावूक कविता .
एकटेपणात सावली
आणि भेटल्यावर पाउस पाडतात
नदीसारखे नितळ पाणी
समुद्रापर्यंत ..वाहत आणतात
जिव्हाळ्याची माणसं अशी
मनात साठून राहतात ...(साठवण ..मेधा थळे)
१०. कवीच्या मनात कविते विषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता ..सुनंदा कुलकर्णी यांची..
कविता म्हणजे काय असते..? हे सांगतांना त्या म्हणतात ..
कविता म्हणजे माउली
कविता म्हणजे सावली
सतत माझ्या पाठी असते
जगण्याचे मला बळ देते.....( कविता म्हणजे काय असते..? .सुनंदा कुलकर्णी )
देशासाठी लढणारे सैनिक आमचे.हा तर देशाचा अभिमानाचा विषय ..या विषयीची ही कविता..
११.विनाश दाटता ऐसा
कुणी कुणाचा नसतो
तेथे सैनिक आमचा हा
देव होऊनी येतो ....(सैनिक आमचा ..भि.द .उशीर उर्फ रविकिरण )
राजकारण आणि त्यातील पक्ष बदलू मंडळी यांच्यावर भाष्य करणारी ही मार्मिक रचना ..
१२. सरड्यासारखे रंग बदलण्याची
किमया असते आमच्या अंगात
बाजी अंगलट आली तर
माफीनामा सदैव आमच्या खिशात ....(आम्ही आयाराम गयाराम ....गजानन प्रधान )
१३. निसर्गाशी फारकत घेणारा माणूस कसा आहे याचे वर्णन करणारी कविता अचूक चित्र उभे करते..
जंगलातल्या मुक्यांना म्हणतो आहे रानटी
स्वतःच्या महालासाठी मोडतोय त्यांची घरटी
माणूस माणूस राहिला नाही झालाय जनावर
अनावश्यक स्पर्धेपायी झालाय अनावर ....(रानटी ..हेमंत परब )
वरील विवेचनात सर्वच कवींच्या रचनांचे उल्लेख करणे शक्य नाही, लेखन मर्यादा लक्षात घ्यावी ही विनंती.
आभाळमाया 'हा प्रातिनिधिक कवितासंग्रह असला तरी यातील कवी -मंडळीनी कवितेचे प्रतिनिधित्व नक्कीच केले आहे .सर्वांच्या लेखन-प्रवासास मन:पूर्वक शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------
स्वागत -पुस्तकाचे -
अरुण वि.देशपांडे -पुणे
मो-९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------
आभाळमाया -
(प्रातिनिधिक कविता संग्रह )-
संपादक -डॉ.अरविंद नेरकर
श्रद्धा प्रकाशन ,
डी.एस.के "विश्व "
धायरी -पुणे- ११
पृ-१४४ , मुल्य-रु.१५०/-
संपर्क -९०११०२४१८४
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------