पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ ------------------------------ ---------------
अंतरीच्या जिव्हाळ्याच्या बोलक्या कविता -
"जिव्हाळा "- कविता संग्रह .
बाल -कवयित्री - कु. लक्ष्मी बनसोडे
------------------------------ ------------------------------ ---------------------
नमस्कार -
रसिक वाचक मित्र हो ,
------------------------------ ----------------------
पुस्तक-परिचय लेखन करणे माझ्या सारख्या कविता -वाचकासाठी एक कविता अनुभूती असते .
प्रत्येक कवी , त्यचे कवी -मन , आणि त्याला लाभलेली कवी-दृष्टी , त्याचा जगाकडे पाहण्याचा
स्वतंत्र असा दृष्टीकोन .. या सगळ्या गोष्टी कविता संग्रह वाचतांना जाणून घेतांना ,
दरवेळी एक नवा जीवन अनुभव घेत घेत आपल्यातला कवी रसिक संपन्न होत जातो .
अशाच एका कवयित्रीच्या अद्भुत काव्य-लेखन-प्रतिभेचा अविष्कार पुस्तक रुपात पाहण्याचा छान
योग माझ्या वाट्याला आले. या कविता संग्रहाचे शीर्षक आहे ..जिव्हाळा " आणि कवयित्रीचे नाव आहे-
कु.लक्ष्मी बनसोडे ., जी बाल-कवयित्री म्हणून परिचित झाली आहे.
शालेय विद्यार्थिनी असलेल्या या बाल - कवयित्रीच्या कविता संग्रहातील कविता वाचतांना एक जाणवले
की '' प्रतिभा " ही एक देणगी आहे ..जी जन्मताच लाभलेली असते ..म्हणूनच तिचा अविष्कार अगदी
सहजतेने होत असतो . "
अशा सहज आविष्कृत झालेल्या कवितांचा जिव्हाळा " हा कविता संग्रह जाणकारांचे
आणि वाचकांचे लक्ष वेधून घेईल असाच झालेला आहे. या बद्दल बाल -कवयित्री -लक्ष्मीचे अभिनंदन करू या .
पिढी दर पिढी .सगळेच बदलून जात असते ...आजची उमलती पिढी असो व तरुणाई असो ..
गेल्या पिढीतील याच वयोगटातील त्या कालच्या- उमलत्या पिढीच्या आणि तरुणाईच्या मानसिकतेत खूप मोठा
फरक आहे ..जो आपल्याला चिंतन करण्यास भाग पाडणारा आहे.आणि हे बदल जाणवून आपले मन थक्क होऊन जाते .
या नव्या पिढीची मानसिकता , विचार करण्याची पद्धत , आणि समोरच्या प्रत्येक गोष्टींचा अन्वयार्थ लावण्याची
धडपड मोठीच कौतुकास्पद आहे . अशा या नव्या पिढीची प्रतिनिधित्व करणारी ही कवयित्री आहे असे म्हणता येईल.
या कविता लेखनात एक सूत्र आहे - जे मोठे भावनिक आहे .. आपल्या जगण्यावर ज्यांचा सर्वाधिक प्रभाव असतो ,
ज्यांच्यामुळे आपण घडतो , सावरतो , जीवनाची वाटचाल सुकर आणि सुलभतेने करतो ..अशा आपल्या माणसांच्या
बद्दल अतिशय जिव्हाळ्याने कवयित्री आपल्या कवितेतून कृतज्ञता व्यक्त करते .
स्वतःच्या कविता लेखना बद्दल कवयित्री कवितेतूनच म्हणते -
"जो पर्यंत शेवटचा श्वास आहे
तो पर्यंत लिहिण्याची जिद्द आहे "
आणि जगण्याबद्दल ,आयुष्याबद्दल ही कवयित्री अतिशय जागरूक आहे - त्यामळे मनातील भाव-भावना , विचार -कल्पना
मांडण्याचा तिचा प्रयत्न आहे . आपल्या जीवनातील प्रवास कसा असतो व आजची वस्तुस्थिती कशी आहे "
हे काव्य संग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कवीमनाची अशी वास्तवाशी असलेली बांधलकी " कवितेचे स्वरूप एक जाणीव -असलेली कविता असे होऊन जाते .
कवयित्रीची ही भूमिका प्रामाणिकपणे व्यक्त होते . तिच्या कवितेतील ठामपणा , विचारांशी बांधिलकी हे खूप विशेष आहे.
गंभीर , चिंतनशील ,वैचारिक आणि सामाजिक भान असलेली ही कवयित्री ..आणि तिच्या कविता एकेमेकास अनुरूप आहेत .
प्रसिध्द कवी श्री.दयासागर बन्ने -यांची प्रस्तावना -
कवयित्रीच्या कविते बद्दल अचूक व्यक्त होते .
धनापेक्षा मनाचा विचार , विचारपूर्वक आपल्या ओंजळीत देणारा काव्य संग्रह म्हणजे - जिव्हाळा "हा संग्रह .
निसर्ग ,सृष्टीबद्दल "जिव्हाळा " जपण्याचं भान ही कविता देते. प्रेमाचे उदात्त रूप म्हणजे विश्वबंधुता असा विशाल
विचार करणारी कविता आहे.
कवयित्री -लक्ष्मी बनसोडे ,देशिंग -हरोलीच्या श्री.महालक्ष्मी हायस्कूलची विद्यार्थिनी .
या शाळेतील तिच्या गुरुजनांनी तिच्या कविमनाला कविता लेखनासाठी खूप प्रेरणा दिली आहे.
श्री. मोहन रघुनाथ चव्हाण सर, कवयित्री - सौ.सुरेखा निवास कांबळे टीचर ,सौ. मनीषा पाटील -टीचर
यांनी देखील आपल्या शाळेतील या गुणी कवयित्रीला लेखन -शुभेच्छा दिल्या आहेत.
या संग्रहातील काही कविता अंश -उदाहरण म्हणून देतो -
नागरी जीवनाचे यथार्थ वर्णन करणारी एक कविता -
शहरी जीवन
फार बिकट
येथे कोणी कोणाची
पहात नाही वाट
सर्वांची असते
एक सारखीच गत ..( माझे मत ..पृ..३४ ).,
जगाचा पोशिंदा ..शेतकरी , हा बळीराजा , त्याबद्दलच्या कवितेत विचारलेला रोखठोक सवाल
"शेतकऱ्याला आत्महत्या करायला
भाग पाडता तुम्ही
सगळी शेतकरी असेच करायला
लागले तर काय खाल तुम्ही ..(शेतकरी कर्जमाफी ..पृ.३५ )
एकत्र कुटुंब ..विभक्त झाले .आणि काय हाल
झालेत. एका महत्वाच्या समस्येवर ही कविता -
"बाहेर व्हा घरातुनी
हे शब्द पडताच कानी
आईबापाच्या मनी
दुखाचा डोंगर कोसळी ... ( वृधाश्रामाची वाट..पृ..३७ ),
मुलासाठी अतिशय जिव्हाळ्याचे नाते ..ते कोणते ? त्याची कविता ..
"ज्यांच्या मुळे मी आज सन्मानाने जगू शकले
त्यांनी मला या जगात जगायला शिकवले
असे ते
म्हणजे माझे बाबा .... माझे बाबा
आणि फक्त माझे बाबा ....( असे ते ..पृ..२७ ),
माझी आई "ही कविता अतिशय हृदयंगम अशी आहे ..
घर हे मंदिर .आणि त्यातील देवता .आई .. किती छान ना !
"कृतज्ञतेचे प्रतिक ती
जणू मायेचा सागर ती
कृताज्ञेतेने वंदन करतो
देवतेस या घरराउळी ... (माझी आई ..पृ..९ )
राष्ट्र -रक्षणार्थ प्राणाची बाजी देणारे आपले जवान आपला अभिमान
त्यांच्या विषयी व्यक्त होणारी एक वेगळीच भावनिक कविता ..
"स्वतःच घालतो देशासठी धोक्यात बह्विश
ते आहे भारत मातेच्या जवानांचे आयुष्य " (जवानाचे आयुष्य ..पृ..११ ),
विद्यार्थिनी असलेली बाल-कवयित्री कु.लक्ष्मी बनसोडे
,शालेयजीवनात ती काव्य लेखन करते आहे आणि ..या बाल-कवयित्रीत उद्याच्या एका
एक परिपक्व ..जाणीवेच्या कवयित्रीचे असणे या संग्रहातील कवितातून जाणवणारे आहे..
३३ कवितांचा समावेश असलेल्या .जिव्हाळा .कविता संग्रह प्रकाशित केला आहे..फिनिक्स पब्लिकेशन यांनी.
बाल -कवयित्रीच्या कविता संग्रहाचे त्यांनी केलेले हे प्रकाशन कार्य अनुकरणीय असेच आहे..
बाल-कवयित्री - कु.लक्ष्मी बनसोडे ..हिच्या काव्य-लेखन - प्रवासास खूप खूप शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
पुस्तक परिचय लेख -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ --
"जिव्हाळा "- कविता संग्रह .
कवयित्री - कु. लक्ष्मी बनसोडे
संपर्क - ८९९९९४५०६८८
------------------------------ ------------------------------ -------------------
जिव्हाळा - कविता संग्रह
कवयित्री - कु.लक्ष्मी बनसोडे
पृ. ४० , मूल्य- रु.४० /-
फिनिक्स पब्लिकेशन
संपर्क - ९०९६७२२७९०
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------
No comments:
Post a Comment