Wednesday, March 27, 2019

पुस्तक-परिचय लेख- कविता -संग्रह - "सेल्फी ".

पुस्तक परिचय-लेख-
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
------------------------------------
कविता -संग्रह - सेल्फी 
-साहेबराव पवळे 
-------------------------------------------------------
पुण्यात वारजे येथे वास्तव्यास असलेले कवी- साहेबराव पवळे यांचे लेखन विश्व बहरले ते राजगुरूनगर भवतीच्या ग्रामीण परिसरात.
अनेक कवी सम्मेलनातील त्यांच्या नियमित सहभागामुळे कवी म्हणून ते सर्वपरिचित आहेत. दिवाळी अंकातूनही त्यांच्या कविता व कथा प्रसिद्ध होतात.

बहर " हा त्यांचा पहिला प्रकाशित कविता संग्रह .  या लिहित्या कवीचा दुसरा कविता संग्रह " सेल्फी' " प्रकाशक ललित कोलते यांच्या
 ललित पब्लिकेशन्स -पुणे,यांनी प्रकाशित केला आहे.
आपल्या वाचनात नेहमी ज्या मोठ्या म्हणता येतील अशा कविता येतात त्या 28 ते 32 म्हणजेच 7- 8 कडव्यांच्या असतात.
प्रस्तुत - सेल्फी "संग्रहातील कविता यापेक्षाही दुप्पट- तिप्पट मोठ्या , 3 ते चार पानांच्या कविता आहेत.
कवीला आपले दीर्घ -कविता 'लेखन अतिशय प्रिय असणे', अगदी स्वाभाविक आहे. याला एक भावनिक किनार देखील आहे.
 'त्याबद्दलचे मनोगत कवींच्या शब्दातच वाचू या-
"सेल्फी हा दीर्घ कवितांचा संग्रह आहे.
अनेक काव्यमचं व काव्यस्पर्धेत दीर्घ काव्यरचनेमुळे माझा सहभाग नाकारला गेला आहे".कविता आशयबध्द असून सुद्धा प्रवेश नाकारला गेला".
याचा राग न मानता या कवीने आपले कविता लेखन चालू ठेवले. 

आपल्या कविता लेखनाच्या प्रयोजनाबद्दल कवी म्हणतो-
माझ्या दीर्घ कवितांतून सर्वसामान्य लोकांचे दु:ख, सल,त्यांचा कोंडमारा " या भावना व्यक्त करीत असतो ,त्याच प्रमाणे
सामाजिक बदल व परिवर्तनाचा मार्ग,परिणामाची वास्तवता, कटू सत्य"
असे माझ्या कवितेतून व्यक्त होत असते.
आपल्या लेखनहेतूशी कवी अतिशय प्रामाणिक आहे, त्यांची तळमळ आतुन- मनातून आहे", याची प्रचिती "सेल्फी -संग्रहातील हे दीर्घ कविता वाचतांना नक्कीच येते.
या लेखनाला पद्य -कविता म्हणायचे का?या तर गद्य स्वरूपातील कविता ? असे विचार वाचकांच्या मनात येणे आश्चर्याचे नाही.

एक वाचक म्हणून या सर्व कवितांबद्दल मला जाणवले  आहे  ते असे-
खरे तर - "या कवितांना सामाजिक आणि वैचारिक , प्रबोधन करणाऱ्या गद्य स्वरूपातील-विधानात्मक,मुक्त- कविता " असे म्हणता येईल. "
एका विषयाला धरून हे कविता लेखन आहे. त्यामुळे प्रत्येक दीर्घ कवितेला  एक सूत्र आहे",त्याला धरून एक मोठा काल- अवकाश ",
 कवी साहेबराव आपल्या कवितेतून साकारतात, या कवितांचा हा लेखन विशेष कौतुकास्पद वाटावा असाच आहे. "

या कवितेतून कवीने त्याच्या मनातील
सामाजिक परिस्थितीवरील त्याचे मत, आणि विचार व्यक्त करण्याचे प्रयत्न केले आहेत,ते ही अगदी सविस्तरपणे.  मग या कविता गद्य वाटो, की आणखी काही,"
ते कवींसाठी मह्त्वाचे नाही,
कवीसाठी मह्त्वाचे आहे -जे दिसते आहे त्याबद्दल सांगणे, आणि शब्दातून ते मांडणे जे  समाजहितासाठीचे आहे .
आणि हे सगळं कवीने त्याच्या पद्धतीने व्यक्त केले आहे. हे असे प्रांजळपणच  या कवितांचे खरे स्वरूप आहे. "

या संग्रहाच्या अनुक्रमणिकची एक गमंत आहे, कविता कोणत्या प्रकारची आहे हे
कवीने स्वतःच्या नावाच्या अक्षरातून सांगितले आहे, कसे ते बघा-
सामाजिक कविता
हेलकवा देणाऱ्या कविता
बहुरंगी कविता
राजकीय कविता
वस्त्रहरण कविता
"साहेबराव" हे आहे कवीचे नाव.

83 पृष्ठांच्या सेल्फी " संग्रहात कविता आहेत त्या फक्त 29 .या संख्येवरून कवितेच्या दीर्घ रूपाची कल्पना यावी..
या मोठ्या कवितेतून कवीने व्यापक अशा
सांस्कृतिक , सामाजिक, राजकीय, भावनिक बदलांचे संदर्भ देतांना एक जाणीव करून दिली आहे, यातूनच बदल होईल, परिवर्तन होईल असा आशावाद कवी व्यक्त करतो",
कवींची ही लेखन भूमिका महत्त्वाची वाटावी ", असे वाटते.
विविध सामाजिक प्रश्न, समस्या, आधुनिक जीवनमान व त्यामुळे आर्थिक व भावनिक प्रश्न कसे निर्माण झालेत,
या विषयावरती लिहितांना कवीला भवतालीच्या परिस्थितीची अचूक जाण आहे अगदी टप्प्या टप्प्याने आणि क्रमाने त्या त्या विषयांवर  दीर्घ कविता बोलते.

काही  कवितेतील कडवी उदाहरण म्हणून देतोय..

जुन्या आणि नव्या पिढीतील संवाद ,विसंवाद जुनी गोष्ट असली तरी
हल्ली "वृद्धाश्रम " या संकल्पनेमुळे सर्वांचे भावविश्व कोसळून गेले आहे,
नव्या पिढीतील नातू आपल्या आईबाबांना सांगतोय -

पण..बाबा..
आजी- आजोबा गावी अनाथा सारखे जगले
तुमच्या मनीऑर्डरला नाही भुलले
भावबंधानी त्यांना प्रेम दिले
'मी आजी आजोबांच्या प्रेमाला दुरावलो
मग माझं काय चुकलं ?
बाबा झटपट उरका
वृद्धाश्रमात जायचं आहे तुम्हाला..
..विरहाचे दु:ख  (पृ-२९),

 आणखी एका कवितेत कवी म्हणतो-
"पाश्चिमात्याचे अनुकरण करून
फादर डे साजरा करून
बापाचे स्मरण करून
बापाचे ऋण फेडता येत नाही..
..बाप (पृ..३५),
"सेल्फी "या शीर्षक कवितेत आपण नेमक्या कोणत्या सेल्फी काढीत नाहीत याची खंत अशी व्यक्त करतो-
"आतंकवाद्यांनी सैनिक पोलीस मारले
त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली
त्या पोरक्या कुटुंबाबरोबर 
सांत्वनाचा सेल्फी काढायला कोणी येईना
..सेल्फी ' ..(पृ..६७),
कवितेबद्दल आपल्या भावना कवी अशा व्यक्त करतो-
"कविता असते भजन
त्यात असते समाज प्रबोधन
कविता असते भारूड
त्यात असते परिवर्तनाचे गारुड..
..कविता..(पृ..४९).

कवी साहेबराव पवळे यांच्या नव्या कवितासंग्रहातील कविता नेहेमी प्रमाणे  आशयपूर्ण असतील , त्या यापुढे मात्र ,
 शब्द-संख्येने आटोपशीर असतील  अशी अपेक्षा करू या .
 त्यांना पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा .
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------
सेल्फी -
(कविता संग्रह )
पृ -८४, मूल्य-रु.१००/-
साहेबराव पवळे 
संपर्क - ९३२२८४०८७० 
------------------------------------------------------
प्रकाशक - ललित पब्लिकेशन , पुणे.
संपर्क - ७७७६८२५७८३ 
------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment