Wednesday, December 13, 2017

पुस्तक परिचय लेख- कविता - संग्रह - " अर्णव "

पुस्तक परिचय लेख-
कविता - संग्रह - " अर्णव "
कवी मन लाभलेले मनीष कानडे यांनी
त्यांच्या मन सागराचे शब्द मंथन केले ,ती अनुभूती त्यांनी चारोळी आणि कवितेतून व्यक्त केली आहे, त्यांच्या या रचनांचा संग्रह "  अर्णव" या शिर्षकाने प्रसिद्ध झाला आहे.
तरुण वयाच्या या कवीचे अनुभव विश्व त्याच्या परिघात असलेल्या कॉलेज, कॉलेज कॅम्पस, वास्तव्य असलेले पुणे शहर,आणि कवीला त्याच्या प्रवासाचे अनुभव , अशा एका मर्यादित वर्तुळाचे आहे हे जाणवते,
असे आले तरी या कविमानाला विशाल अशा समुद्राचे, सागराचे आकर्षण आहे, एक विलक्षण अशी ओढ या सागरा विषयी आहे,
असे ही म्हणता येईल की भावनांची भरती कवींच्या मन सागराला  अव्याहतपणे आलेली असते.
अशाच काव्यरचना प्रस्तुतच्या संग्रहात आहेत,
कवींच्या अंतरात असलेला असीम आशावाद या रचनाचा अंतरस्वर आहे असे सतत जाणवत राहाते .
कवीच्या हळव्या नि भावुक मनाच्या चित्रांकीत रचना संग्रहाच्या सुरेख स्वरूपात भर घालणाऱ्या आहेत.
पाना गणिक डाव्या बाजूला चारोळी रचना व उजव्या बाजूला  कविता रचना अशी मांडणी केली आहे.
या रचना कवीने वाचकांशी साधलेला मुक्त संवाद आहे, एक मित्र आपल्या खास अशा जिवलगा बरोबर या सगळ्या भावना शेअर करतो आहे अशा स्वरूपाच्या या सर्व रचना आहेत.
आपले आयुष्य एक प्रवास असतो, अशा प्रवासात आपले कुणी सोबत असावे हे सांगतांना कवी म्हणतो-
"आपले ध्येय गाठणे
हा एकच विचार मनात असावा
खडतर आयुष्याचा हा प्रवास
एकट्याचा मात्र नक्कीच नसावा...
(प्रवास पृ- ४७),
अनुभव शिदोरी सोबत असली की मनाला सांगणे सहज सोपे असते, ते कसे ते पहा..
"वाया गेलेली वर्षे
बरेच काही शिकवून गेली
परत तीच चूक न करण्याची
आश्वासनही घेऊन गेली ...( पृ- ५४),
खुले आकाश, भोवतालीचा निसर्ग हे सारे कवीचे आवडते सोबती यांच्या सहवासात कवी मन सहजतेने फुलून येते..
" निळक्षार आकाश
मला नेहमी खुणावतं
विचारांचा वेग
आणखी दुणावतं ..(पृ- ५६),
कवी प्रतिभा भरात येण्यासाठी निमित्त पाहिजे असतं ..त्यासाठी असे घडले तर ते हवेच असते
" एखादी अत्तराची कुपी
बऱ्याच दिवसांनी उघडल्यावर
जसा गन्ध दरवळतो
तसं पहिल्या पावसानंतर होतं..
(पहिला पाऊस..पृ- २५),
आठवणीत रमलेला हा कवी " सहज" या कवितेत सहजपणे लिहितो..
कॉलेजचे मंतरलेले दिवस खरंच किती छान होते
पैसा हाती नव्हता पण तरी ते दिवस लाखमोलाचे होते ..."
(पृ..१९),
मन सागरात भरती येते नि मग काय होतं..
"मनातल्या सागराची
आकाशी भेट होते
मनातील वादळात
मग शब्दफेक होते...( पृ- १२),
आठवणी आणि मन या एकत्र असतात, यात रमलेले आपले मन भावव्याकुल होऊन जाते
मग -आठवणी " या छान कवितेत कवी म्हणतो..
' अजूनही आहेत आठवणी
  खूप सांगण्या सारख्या
  अगदी रव्याच्या लाडूतील
   गोड रव्यासारख्या ...
(पृ- ९)
रसिक हो , 64 पृष्ठांच्या " अर्णव कविता संग्रहात अतिशय सहज शैलीत मनीष कानडे आपल्या कविमनास अभिव्यक्त करतात, या सर्वच रचना भावनिक विश्व साकार करून आपल्या मनाला आपलेसे करून घेतात ,
हे कवी मनीष कानडे याना खूप छान जमले आहे, यापुढेही त्यांच्या कवितेचा सहज प्रवास घडो अशा शुभेच्छा देतो.
प्रकाशक नंदिनी तांबोळी यांच्या नंदिनी पब्लिशिंग हाऊस - पुणे यांनी हा सुरेख संग्रह प्रकाशित केला आहे.
-------------------------------------------------------
पुस्तक परिचय लेखक -
अरुण वि. देशपांडे - पुणे.
संपर्क - 9850177342
------------------------------------
कवी - मनीष कानडे
9096748802
------------------ ------------------
अर्णव कविता संग्रह-
मुल्य- रु.100/ , पृ- 64
नंदिनी पब्लिशिंग हाऊस पुणे,
9422037714
---------------------------------------

No comments:

Post a Comment