Saturday, January 4, 2020

पुस्तक -परिचय - कविता-संग्रह - "दिती "

पुस्तक-परिचय लेख - 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------
निसर्ग आणि माणूस यांच्यातील भावबंधांचे इंद्रधनुष्य...!
कविता -संग्रह -
 दिती - 
-जयश्री दाणी
----------------------------------------------------------------

कवयित्री म्हणून जयश्री दाणी इंटरनेटवर आणि प्रिंट मिडिया मधून सातत्याने साहित्य - लेखन करीत असतात .
त्यांच्या काव्यलेखनाचा अविष्कार वाचक-मित्र गेल्या अनेक वर्षा पासून पाहत आहेत , त्यांच्या लेखनास आणि  कवितांना खूप  प्रतिसाद मिळत असतो, हे 
कवयित्री -साठी खूप प्रेरक असेच आहे.

नागपूरस्थित लेखिका -कवयित्री जयश्री दाणी हे नाव सर्वपरिचित आहे .आपल्या लेखनाने त्यांनी स्वताचा असा एक वाचक परिवार 
 निर्माण केला आहे . या परिवारातील मी देखील एक वाचक-सदस्य आहे.
 "पहिला कविता -संग्रह " असा विशेष उल्लेख करून ..त्यांच्या "दिती " या कविता संग्रह बद्दल अभिप्राय देणे "एक,
आनंददायी असे आस्वादक -कार्य आहे .
 .दिती " कविता -संग्रहात  एकूण नव्वद (९०) कविता आहेत.. अभंग- ओवी , हायकू , मुक्तछंद "या प्रकारातील  या रचना आहेत.
यातील बहुसंख्य रचना छोट्या-मोठ्या अशा ही आहेत . प्रकार कितीही आणि कोणते ही असो..
या कवितेतला  " माणूस,आणि  निसर्ग , यांच्यातील  भावबंध थेट मनाला भिडणारे आहेत.

 या बद्दलची ही अगदी समर्पक ओळ- म्हणजे या 
कवयित्रीचे मनोगतच आहे -
"जितकी जखम खोल 
तितकी कवितेत ओल "

मग ,या जखमा कशाच्या आहेत ? जखमा कुणी दिल्या, कुणी केल्या या जखमा .. याचे उत्तर संग्रहातील कवितेतून मिळते, जे मनाला चटका 
लावणारे असेच आहे. कवी-मनाचे जे विशेष आपल्याला जाणवत असतात ..ते  जयश्री दाणी यांच्या कवी-मनात आहेत. निसर्ग , प्रेम, स्त्री -जीवन,
समाज आणि आपण , त्याने व्यापलेला आपला अवकाश , त्यातील भले-बुरे असे खूप काही ,या बद्दल कवयित्री अतिशय भावूक,होऊन लिहिते, व्यथित 
मनाने लिहिते ..हे जाणवते , सामाजिक भान ,खोलवर रुजलेली एक सर्व-समावेशक जाणीव ..यातून  व्यक्त होतांना दिसते.
यात भर घालून मला एक जरूर सांगावेसे  वाटते ..की -

माणूस वरवर कसा असतो ,
हे महत्वाचे नाही ,
जर - तो कवी असेल तर, 
आतून खूप खोल खोल असतो ",

कवयित्री -जयश्री दाणी यांच्यासाठी या ओळी अगदी समर्पक आहेत..

आपले जगणे .आपण शब्दातून व्यक्त करतो ,याचे माध्यम कविता असेल तर.. हे सगळे सांगणे .ज्या शब्दातून येते ..ते खूपच अर्थ-वाही "
असावे लागतात ",आणि शब्दांचे हे प्रव्हीपण ", जयश्री दाणी यांच्या कवितांचे एक ठळक विशेष  आहे.

मौन असलेल्या मनात ही एक संवाद सुरु असतो .हा शोध असतो .आपल्या सभोवतालचा .कवीची .अशीच अवस्था आहे..

" मौनाच्या सुरावटीवर हळूच 
कोण सोडून जाई थेंब हळवा
दुखर्या भागातही सर सरे 
उमलतांना थांबलेला फुलवा ... ( कविता ..पृ..८९ ),

कवयित्री जयश्री दाणी.सतत माणसाच्या सुख-दुखा बद्दल विचार करतात , माणूस आणि निसर्ग हा या कवितांचा "चिंतन-विषय आहे ",
त्या सतत ..कानोसा " घेत असतात ..तो असा ..
"कशाच्या मोहाने 
काय  ठेवलेय 
पहा , यातनांना
पंख फुटलेय...... ( कानोसा ..पृ.२० )..,

कळाहीन आयुष्य वाट्याला आल्याची खंत , या कवितेतून येते ..
"शब्दहीन काळा आली 
त्या फुलाच्या झुडुपाला 
साव्लीचेच वावडे 
न सरणार्या उन्हाला  ... ( उन्हाला..पृ..२४ ),

अबोध असे रम्य-बालपण ,शैशव ही अवस्था आपण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आठवतो, प्रत्येकाला आपल्यातले "एक मूल "
खुणावत असते .. काय होतं अशा वेळी,, त्याची ही कविता ..

" प्रत्येकजण झोपतांना 
लहान तान्हं मूल होतं 
आठवणीच्या पारावर 
काळ पांढरं ss  धावतं .... ( तान्हं मूल..पृ...३२ ), 

अशी अवस्था ,जी पुन्हा  न परतणारी आहे  ,काय करावे अशा वेळी ? तर.. मनाची अवस्था "एकल मग्न " व्हावी ..

"या एकल मग्न दिशेत 
लाज कापरा सुवास 
माळून गेली कधीचीच 
गोंडस गुलाबी आस ...... ( एकालमग्न ...पृ..३६ ),,

माणसाच्या चेहेर्यावर जे दिसत नाही , ते डोळ्यात दिसते ..या बद्दलची ही कविता खूप छान आहे.

"डोळे बोले काहीबाही 
जैसा पाउस निर्मोही 

डोळ्यात करुण श्लोक 
दुखा;त आनंदलोक  .. (डोळ्यात ..पृ..८६ ), 

उडते पक्षी " या कवितेतील .पक्षी..म्हणजे आजचा आपल्यातील बदलून गेलेला माणूस नाही ना ?
या बद्दल कवित्रीला प्रश्न पडतो .तो खूप अंतर्मुख करून जातो..

एकही पान नसलेल्या 
वाळक्या उंच काळ्या कथ्या
झाडावर 
संयान्काली जेव्हा असंख्य 
काळे पक्षी जमत असतील 
तेव्हा काय नेमके बोलत असतील ? (..उडते पक्षी ..पृ..७२ ),,

कवयित्रीच्या कविता लेखनाचे विषय .निसर्ग आणि माणूस हा आहे, यातील एकरूपता किती विलक्षण आहे, हे सांगणाऱ्या कविता
बोलक्या आहेत.. निसर्ग-चक्र , ऋतू-चक्र , दिन- चक्र ..,पाउस, ऊन, पहात, दुपार , संध्याकाळ , रात्र , उजेड, प्रकाश , अंधार ,
चांदणे .. या भवती आपल्या आयुष्याचे  रहाटगाडगे " कसे फिरत असते ..याची अनुभूती देणाऱ्या कविता संग्रहाच्या मौलीक्तेत भर घालतात.
काही शीर्षके -
ऋतू "(पृ.२५ ",)  "वसंतखुणा  (पृ.२८ ) , "आभाळ "(पृ.४४ ), सांजफुल (पृ.४५ ), आकाशरंग (पृ.५१ ), " पिवळ्या फुलांची गल्ली (पृ.५३ ),
संध्यामग्न  (पृ.५७ ), , "झाड,' (पृ, ६४ ), मुलींचा गुच्छ " (पृ,६६ ), बर्फाळलेली  दुपार (६९ ),  "दिवे लागण ( पृ.७३ ),, नभी चांदणे वाजले "(पृ.८८),

काही संवादी कवितेतून  आणि काही अतिशय मोजक्या ओळीतून ,..या कविता आपल्याशी भावूक ,हळवे मनोगत व्यक्त करतात ,
कवयित्री- जयश्री दाणी यांच्या सहज लेखन - शैलीचे कौतुक केले पाहिजे . भावनिक गुंता किती कठीण आणि किचकट असतो , याची कल्पना 
आपल्या सगळ्यांना आहे, अशा विषयावर असे सहजपणे लिहिणे , ते योग्य शब्दात मांडणे सोपे मुळीच नसते , असे असल्यामुळे ,
कवयित्री- जयश्री दाणी यांच्या सहज लेखन - शैलीचे कौतुक केले पाहिजे   .
"दिती " कविता संग्रह त्यांचा पहिला कविता संग्रह आहे, या पुढे त्यांच्या भाव-कवितांचे असेच सुरेख संग्रह येत राहोत या शुभेच्छा देतो.

या संग्रहात - कविते सोबत रेखाटने आहेत त्याचे चित्रकार आहेत.अमरावतीचे कलावंत - उद्धव शहाणे .
नागपूरच्या व्ही.कांचन .यांनी संग्रहाचे अनुरूप असे मुखपृष्ठ केले आहे 
या दोन्ही कलाकारांचे अभिनंदन.

अमरावती येथील - शब्दजा प्रकाशनाने  "दिती " कविता संग्रह प्रकाशित केला आहे.त्यांचे आभार मानू या.

 कवयित्री जयश्री दाणी यांचा  "दिती "  हा पहिला कविता संग्रह आहे, या पुढेही  त्यांच्या भाव-कवितांचे असेच सुरेख संग्रह येत राहोत या शुभेच्छा देतो.  
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  पुस्तक-परिचय लेख - 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------------
कविता -संग्रह -
 दिती - -जयश्री दाणी
पृ.९० , मूल्य- रु.१५० /-
----------------------------------------------------------------
प्रकाशक -
राजेश  बहाळे
शब्दजा प्रकाशन 
संपर्क - ९२२५२२३८०० 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment