Friday, October 21, 2016

लेख- पुस्तक-परिचय - "उत्तरा - (कविता संग्रह )



ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------
-उत्तरा "(कविता संग्रह)
------------------------------------------------------------------
सोलापूरचे श्री.रमेश कलशेट्टी एक सर्वपरिचित व्यक्तिमत्व आहे.प्रभावी व्यक्तिमत्वाचा हा कवी - बहुभाषी आहे ",
कन्नड , तेलगु आणि मराठी "या तीनही भाषेतून त्यांचा सहज-संवाद चालू असतो.इंटरनेट आणि फेसबुकच्या माध्यमातून "आपल्या सातत्यपूर्ण लेखनाने लक्षवेधी कविता रचना करणारे कवी " असाही "रमेश कलशेट्टी यांचा परिचय करून देता येईल.
या अगोदर त्यांचे ..१. सहज , २.आभास हा ..असे दोन चारोळी संग्रह संग्रह प्रकाशित झालेले आहेत ,यावरून या कवीचा कविता प्रवास मोठ्या नेटाने चालू आहे हे लक्षात येते.चारोळी लेखन हा या कवीचा नित्य लेखनाचा लेखन प्रकार असला तरी..कविता लेखन उर्मी "कशी स्वस्थ बसू देत नाही ? त्यांच्या कवितेचा अविष्कार आपल्याला घडतो आहे तो ..त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या "उत्तरा " या कविता संग्रहातून.
या कविता-लेखनाला एक "लेखन-सूत्र आहे" ते कवीने त्याच्याच मनोगतातून व्यक्त करतांना म्हटले आहे की-
"उत्तरा " हे माझे एक स्वप्न होते. जे स्त्रीच्या प्रत्येक गुणाला दर्शविते. या कविता संग्रहाच्या माध्यमातून मी स्त्रीचे प्रत्येक रूप माझ्या अनुभवातून मांडण्याचे प्रयत्न केले आहे ."
प्रस्तुत संग्रह्तील कविता याच लेखन-सूत्राभोवती - विषय--सुत्राभोवती आहेत" हे संग्रह वाचतांना नक्कीच जाणवते .
उत्तर " या संग्रहात ५३ कविता आहेत .आणि यातील बहुतेक कविता विस्ताराने मोठ्या रचना आहेत ..आटोपशीर कविता असत्या तर अधिक प्रभावी असा हा कविता संग्रह झाला असता' "असे माझे जरी मत असले तरी ते कसे बरोबर नाही हे " संग्रहातील कविता वाचून नक्कीच कळून येते . या कविता कवीच्या वैचारिक चिंतनातून आलेल्या आहेत ..कदाचित त्यामुळे ..थोडक्यात व्यक्त होणे "हे या कवितेला मुळीच शोभणारे नाहीये " हे मात्र नक्की .
संग्रहातील अंतिम रचना "लिहिणे माझे "(पृ.६० ) .या कवितेत कवीच्या व्यक्त होण्याची अपरीयार्हता आहे , मनातली तळमळ आहे ..ते कसे ..बघा -
सोडून दिलेले असते मी लिहिणे
पण अशा काही घटना घडतात
अपमानित होऊन ही कर्तव्यपूर्तीसाठी
लेखणी धरयला पुन्हा हात शिवशिवतात ....(लिहिणे माझे ..)
हे असे होण्याचे कारण .कवीच सांगतो आहे ते "असाच मी " या कवितेतून (पृ..५९ )..
"जे आहे ते
तोंडावर बोलणारा
मरणाच्या भीतीने
सत्याची कास न सोडणारा ...
मनाची अशी निर्भीड होऊन सांगण्याची तयारी आहे म्हणूनच ही कविता सडेतोड शब्दात व्यक्त होते ..आडून आडून किंवा सूचकता " असा सोपा मार्ग या कवितेला भावत नाही "असेच म्हणता येईल.
"निर्भया "..(पृ..९ )..
मेणबत्ती विझेपर्यंत
आम्हा खूप राग असतो
फोटो काढून झाले अन
आम्ही आपले कर्तव्य संपले समजतो ...
देशाला हादरवून सोडणाऱ्या "निर्भया " आणि "अरुणा " या दोन दुखःद घटनांवर दोन -दोन रचना आहेत ."अरुणा ", आणि "निराधार . "अतिशय नेमकेपणाने कवी "या कवितेतून व्यक्त झालेला आहे.
उदा -काय लिहू ? ( (पृ.१० )
"सांग ना मुली काय लिहू ?
तुझ्या भविष्यावर
की न्यायाच्या प्रतीक्षेत
असलेल्या निर्भायावर ?
"स्त्री आणि तिचा पदर " दोन्ही बाहेर वावरतांना काय काय अनुभवत असतात "याचे अस्वथ करणारे चित्रण "पदर" या कवितेत आहे.
"आज ही तू नारी बंदिस्त आहेस
वावरते खुलेआम इथे फक्त नावाला
तुझे तुलाच माहित रोज किती टोचतात
वासनेने बरबटलेल्या नजरा या देःआला ...(पदर ..पृ..३४ ).
दुनिया (पृ..२५ ) ही कविता .संग्रहाच्या मलपृष्ठावर सुद्धा आहे .या कवितेचे हे दुहेरी प्रयोजन या साठीचे असावे की -
कवीचा एक माणूस म्हणून हर प्रहरी संबंध येतो आहे तो याच दुनियेशी .आणि या कवीला कवीला आलेले जीवनानुभव "चांगले नाहीत , मग कवीमनाची झालेली उद्विग्नता" या कवितेत व्यक्त होते ती अशी...
"माणुसकी हे इथे
भ्रम आहे प्रत्येकाचे
या पापी दुनियेत आता
जगायचे आहे कुणाला ..." (दुनिया )
मनाची अशी उध्वस्त अवस्था होणे "म्हणजे जगणे असह्य होऊन जाणे " ,पण म्हणून काही या दुनियेत आपले जगणेच सोडून देणे सोपे असते का ?, नाही ,- मुळीच नाही कारण .भावनिक जगणे सुद्धा माणसांची एक गरज असते ,त्यातून सहवासाने जुळून आलेले ऋणानुबंध .."हा ताण हलका करणारे असतात ..त्या भावनांची अशी कविता होते...
"कळत नाही कधी कधी
अशी काही नाती जुळतात
त्यांच्यातले ऋणानुबंध
निभावणाऱ्यानाच समजतात ...(ऋणानुबंध ..पृ..१३)
स्त्री आणि नारी " आपल्या संस्कृतीतले महत्वाचा घटक.पण, या तिच्या वाट्याला "भीषण असा वर्तमान आलेला आहे..तिच्या अवस्थेवर नेमकेपणाने बोलणारी ही कविता ..
"भरल्या बांगड्या बेदीच्या रुपात
पदराला दिले संस्काराचे नाव
उंबरा म्हणे लक्ष्मणरेषा यांची
त्या चौकटीतली तू एक सुवासिनी ...(नारी ..पृ..२८)
कवी रमेश कलशेट्टी यांच्या "उत्तरा " संग्रहातील कविता फक्त अशाच एक विषयाला स्पर्श करणारी आहे असे नाही ,तर,समाजिक समस्या आणि उद्भवलेले ज्वलंत प्रश्न यावरच्या कविता आहेत.स्त्रीचे "आई" हे रूप कवीच्या कवितेत असतेच .अशा दोन कविता ..१."अशीच असते आई ..(पृ.५४ ), आणि "आई ..(पृ..५७) याही संग्रहात आहेत .."या दोन्ही कविता छानच आहेत हे वेगळे सांगणे न लगे ".
रुक्ष आणि व्यवहारी दुनिया ..कवीला भेटली-दिसली हे असले तरी .."प्रेम ही अशी भावना आहे की जिचा स्पर्श मनाला झाल्यावर जादूच होऊन जाते ..आणि मग .हा कवी "प्रेमाची दुनिया .. "सारखी कविता हा कवी सहजपणे लिहून जातो.संग्रहातील
प्रेम-कवितांची शीर्षके .."प्रेमाच्या दुनियेत ","मिलन ", "तुला वटते ना ...", "राणी ""आठवांचा पाऊस "ई....!
जीवनातील कडू-गोड अनुभव ", स्वतहाचे मन आणि समाज मन यातील संघर्ष ,समाजाप्रती आपली बांधलकी असतेच असते " ही भावना "आणि हे विचार कवीला कविता लेखनास प्रेरणा देतात ..कवी रमेश कलशेट्टी यांच्या दोन चारोळी संग्रहां नंतर आलेला त्यांचा हा कविता संग्रह "उत्तरा "" त्यांच्या काव्यलेखनाच्या स्वप्नापुर्तीचा आरंभ आहे" असे म्हणू या . कारण त्यांनी मनोगतात म्हटले आहे की - "उत्तरा " हे माझे एक स्वप्न होते ", " हे असे न होता यापुढे ही या कवीला अशीच कविता-स्वप्नं पडत रहावीत ..आणि त्यांची कविता नित्यनेमाने आपल्या भेटीस येत राहावी "अशा शुभेच्छा देतो.
सुप्रसिद्ध चित्रकार -खालील खान यांनी चितारलेले सुरेख मुखपृष्ठ -उत्तरा "संग्रहास लाभले आहे.
नंदिनी तांबोळी , आणि नंदिनी पब्लिशिंग हाउस पुणे .यांनी हा सुरेख कविता संग्रह प्रकाशित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
--------------------------------------------------------------------------------
"उत्तरा "- कविता संग्रह "
कवी - रमेश कलशेट्टी
संपर्क -9823430971
----------------------------------------------------------------
उत्तरा "- कविता संग्रह "
पृ.६० , मुल्य- रु.६०/-
प्रकाशक -नंदिनी संतोष तांबोळी ,
नंदिनी पब्लिशिंग हाउस
सिंहगड रोड- पुणे -५१
संपर्क- ९४२२०३७७१४

No comments:

Post a Comment