Saturday, September 21, 2013

पुस्तक -परिचय लेख - कविता -संग्रह -हिरवी लिपी - उर्मिला चाकूरकर.


नमस्कार रसिक हो-
हिरवी लिपी"- उर्मिला चाकूरकर यांच्या
कविताचे प्रकाशन आज पुण्यात संपन्न होते आहे ,
त्या निमित्ताने हा परिचय लेख-
-------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -लेख- अरुण वि.देशपांडे -पुणे

----------------------------------------------

-मन वाचण्यास शिकवणारी -कविता -

-हिरवी लिपी -" उर्मिला चाकूरकर....!

----------------------------------------------------

मराठी कवितेत -आपल्या कविता-लेखनाने आश्वासक स्थान

निर्माण केलेल्या कवयित्री - उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचा

५-वा कविता संग्रह- "हिरवी लिपी ",आपल्या आस्वादानासाठी

आला आहे.

या अगोदरच्या "चांदणचाफा " , " पर्णपाचू " , पर्जन्यास्त्र " ,

आणि "पलाशपंख " ,या कविता -संग्र्हांनी उर्मिला चाकूरकर

यांच्या कवितांची "भावमुद्रा " स्पष्टपणे शब्दरूपात उमटवली आहे .

प्रस्तुतच्या "हिरवी लिपी "या संग्रहातील कविता वाचकांना अधिक

आनंद आणि अनुभूती देणाऱ्या आहेत,असे म्हणावेसे वाटते ।

निसर्ग आणि मनुष्य " यांच्यातील नाते तसे एकरूप असायला हवे आहे,

परंतु सद्य:स्थिती पाहून हे नाते भंगलेले आहे असे पहावयास मिळते ,

"हिरवी लिपी - संग्रहाचे मुखपृष्ठ असेच काहीसे सांगणारे आहे असे मला

सारखे जाणवले .

- निसर्ग -रूप जाणून घेण्यास आपली दृष्टी कमी पडते आहे ",

आणि "दुरावलेले मन- निसर्ग -सहवासात "यावे असेच जणू या कविता

सांगत आहेत - फक्त -भाषा मात्र "हिरवी लिपी " मध्ये आहे.

या निमित्ताने दोन लिपी-मधला साम्य -योग" या ठिकाणी मला सांगावासा वाटतो -

तो म्हणजे आपल्या जुन्या -जाणत्या "मोडी लिपी - विषयी आपल्या मनात एक खासअशी

जिव्हाळ्याची भावना आहे ,आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला

- तिच्या प्रसारा साठी आपल्याला कार्य करावे लागत आहे -,

अगदी असेच महत्वाचे कार्य "निसर्गास समजावून घेण्या साठी "हिरवी लिपी "लिहून

- कवयित्री -उर्मिला चाकूरकर आपल्या कवितेतून केले आहे .. -

आपल्या मनोगतातून त्या म्हणतात की -

माणूस- निसर्ग, माणूस-माणूस, माणूस-समाज या नात्यांचा

शोध हा या "हिरव्या लिपीचा " आशय आहे.

पांढऱ्यावरची काळी अक्षरे वाचायची सवय आपल्याला नेहमीच असते ;

पण काळ्यावरची "हिरवी लिपी " समजून घ्याची तर वेगळी दृष्टी ,समज

असायला हवी.

एकूण ६७ कवितांचा समावेश "हिरवी लिपी "संग्रहात केलेला आहे.

काही कविता चार ओळींच्या आहेत, काही कमी ओळींच्या तर काही

जास्त ओळींच्या कविता आहेत- माझ्या दृष्टीने या सर्व रचनेत एक

साम्य मात्र आहे ते म्हणजे- या सर्व कविता "आशय-संपन्न "आहेत.

काही उदाहरणे -

---------------------------------------

ती शिकली

झपाट्याने

शिक्षण नसतांना

अंगच्याच हुशारीने …. (परिवर्तन पृ-। ६८ ),

आणि-

बाहुल्या मेणाच्या

थिजून गेलेल्या ,

आनंदाने खळखळून

हसायचं विसरून गेलेल्या …… (बाहुल्या मेणाच्या पृ-६० ।)



या ओळी पहा -

------------------------------------------------

अन्याय करण्या एवढाच

तो सहन करण

हा ही गुन्हा आहे

हे समजेस्तोवर

अर्धी जन्मठेप सरूनही गेली होती …… ( सोशिक … पृ.४८ )



आणि -



कुठे वेळ आणि काळ

हाती मेंदी रेखायला

कष्टाचाच झुला होतो

ध्यानी मनी झुलायला ……. (झुला पृ.३३ …)

तसेच या ओळी -

सूर्य पाहून आलेली

माझी नाजूक कविता

झालीय आता

अधिकच तेजस्वी …… ( तेजस्वी पृ.२१ …. )

आणि -----



या शीर्षक ओळी -

----------------------------------

हिरवी लिपी

लिहिता येण्याजोगे

माझ्यातही असावे काही

थोडे हरितद्रव्य ……। ( हिरवी लिपी पृ.१० …।)



आपण आपल्या वास्तवा -पासून ,आपल्या अंतर्मानापासून फटकून राहू शकत नाही,

कारण बाह्य -जगात जे -जे घडते -त्यांची संयत तर , कधी संतप्त अशी प्रतिक्रिया मनात

उमटल्याशिवाय कशी राहील, सामन्य -जन कधी का होईना जागृत होतात , पण कवीचे

मन अधिक " गहिरे असते, जागृत असते", वर्तमानाच्या भीषण ज्वाला मनाला होरपळून

टाकतात , तेव्न्हा "त्याची कविता बोलून जाते , प्रखरतेने व्यक्त होत असते."

अस्वस्थ -कवी मनाचे स्पष्ट असे शब्द -रूप म्हणजे उर्मिला चाकूरकर यांच्या कविता ",

असे म्हणता येईल.

"हिरवी लिपी "-मधील कविता जीवन अनुभवांचे फक्त चित्रण करून थांबत नाहीत ,तर या

कविता "जीवना च्या विविध मुल्यांवर चिंतनशील असे भाष्य करतात ", त्यावेळी या कविता

आपल्याला विचार करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करतात .

त्या द्र्ष्टीने - काही कविता -शीर्षके - "रसिया " , शल्यकर्मी " , २६ / ११ " , "मी आणि ज्वालामुखी "

"निखळ सत्य " , "ललना ", "वाळूंचे कण ",

या सर्व कवितातून जीवनानुभव आणि त्याचे अन्वयार्थ "हाती लागतात "असे जाणवेल.

आजूबाजूच्या वर्तमानाचे - आणि " विपरीत जगण्याचे दर्शन - घडवणाऱ्या कविता , त्यातील अर्थवाही शब्द-रचना"

हे या कवितांचे वैशिष्टय आहे.

निसर्ग - माणूस - समाज जीवन -आणि -जनजीवन या विषयी असलेल्या आस्था हे या

कवितांचे विषय आहेत हे "हिरवी लिपी " वाचतांना जाणवेल.

उर्मिला चाकूरकर यांच्या कविता -लेखनाचा दमदार प्रवास - अगोदरच्या कविता-संग्रहातून

आपण पाहिलेला आहेच - "हिरवी लिपी "या नव्या -संग्रहातील कवितांनी त्यांच्या पुढील सरस

कविता -प्रवासाचे अधिक सुंदर चित्र रसिकांच्या समोर रेखाटले आहे हे नक्की .

चित्रकार -नयन बारहाते - नांदेड -यांनी या संग्रहाचे बहारदार आणि

आशयघन मुखपृष्ठ केले आहे.

कवियत्री -उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचे "हिरवी लिपी "या कविता -

-संग्रहाच्या निमित्ताने अभिनंदन , आणि लेखनासाठी शुभेच्छा.

-------------------------------------------------------------------------------------------------

- अरुण वि देशपांडे .- पुणे .

मो- ९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक -परिचय -

मन वाचण्यास शिकवणारी कविता ",

"हिरवी लिपी " कविता संग्रह .

उर्मिला चाकूरकर .

फोन न. ०२४३१ - २२३०७२

पृ.-८० , किमत - रु.८० /-

---------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment